शिरीष सहस्त्रबुद्धे यांनी मांडले मत : 47 व्या वसंत व्याख्यानमालेला प्रारंभ
प्रतिनिधी/बेळगाव
व्यापाराच्या दृष्टिकोनातून भारतात प्रवेश केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने पुढील काळात देशाच्या संस्कृतीवरच घाला घातला. देशाचा इतिहास हा पराभूताचा इतिहास आहे, हे त्यांनी जागोजागी मांडले. मेकॉले या शिक्षण तज्ञाने तर भारतीय अभ्यासक्रमात अनेक बदल करत संस्कृतीमध्ये किती दोष आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. देशात जर राज्य करायचे असेल तर इतिहासाचे विकृतीकरण केले पाहिजे, या हेतूनेच त्यांनी राज्य केले, असे विचार पुणे येथील शिरीष सहस्त्रबुद्धे यांनी मांडले.
47 व्या वसंत व्याख्यानमालेला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिले पुष्प गुंफताना शिरीष सहस्त्रबुद्धे यांनी ‘भारताच्या खऱया इतिहासाचा शोध’ या विषयावर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर अध्यक्षा प्रा. मीना खानोलकर, उपाध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार, सेपेटरी सुमन रानडे, दीपा देशपांडे, कोषाध्यक्षा प्रियांका केळकर, शिल्पा लांडगे, धनश्री नाईक उपस्थित होत्या.
शिरीष सहस्त्रबुद्धे म्हणाले, जो नजरेला दिसतो अथवा कानाने ऐकतो तो खरा इतिहास नव्हे तर इतिहासात अनेक बदल करण्यात आले आहेत. इतिहासाविषयी अनेक संभ्रम आहेत. आपल्या देशात मौखिक इतिहासावर भर देण्यात आला आहे. लिखित इतिहास क्वचितच आहे. त्यामुळे लिखीत इतिहासच ग्राहय़ मानला जातो. परंतु भारतीय लोकांच्या अज्ञानाचा वापर करत हा लिखित इतिहास आपल्या गरजेनुसार बदलण्यात आला आहे. बराचसा इतिहास हा घडीव असतो, तर काही रचिव असतो. परंतु सध्याचा इतिहास पाहिल्यास रचिवच इतिहास अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. स्नेहा सांगलीकर व पूजा नातू यांनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. अध्यक्षा प्रा. मीना खानोलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्वरूपा इनामदार यांनी कार्यक्रमाचा अहवाल वाचन केला. श्रीया देशपांडे यांनी परिचय करून दिला. प्रा. माधुरी शानभाग यांची 50 पुस्तके प्रकाशित झाल्याबद्दल त्यांचा वसंत व्याख्यानमालेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता कुलकर्णी यांनी केले. यावेळी वसंत व्याख्यानमालेचे सदस्य, महिला व श्रोते उपस्थित होते.
‘काश्मीर फाईल्स’मधून दिसला इतिहास
आपण इतिहास म्हटल्यावर 17 व्या, 18 व्या शतकाचा विचार करतो. परंतु 1990 च्या दशकात भारतातच असलेल्या काश्मिरमध्ये हिंदू पंडितांवर अन्याय झाला. परंतु आजवर आपल्याला झालेला हा अन्याय कधी समजलाच नाही. सध्या गाजत असलेल्या काश्मीर फाईल या चित्रपटामुळे हा अन्याय दिसला. हा देखील इतिहास बदलण्याचा प्रयत्नच होता, असे सहस्त्रबुद्धे यांनी नमूद केले.
आज उमेश झिरपे यांचे व्याख्यान
हेरवाडकर शाळेत सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेंतर्गत दि. 14 रोजी सायंकाळी 5.30 वाजता उमेश झिरपे यांचे ‘गिर्यारोहण ; एक जीवनशैली’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे…
उमेश यांना गिर्यारोहणाचा 40 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 50 हून अधिक हिमालयीन गिर्यारोहण मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. माऊंट एव्हरेस्ट, माऊंट कांचनजुंगा, माऊंट मकालु यासह 8 यशस्वी अष्टहजारी शिखर मोहिमांचे नेते असून अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय आहेत.
श्री शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्कार या महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च पुरस्काराने ते सन्मानित आहेत. जीजीआयएम या दक्षिण भारतातील पहिल्या व एकमेव गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेचे ते संस्थापक संचालक आहेत. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ या राज्यस्तरीय शिखर संस्थेचे अध्यक्ष आहेत.