रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आश्वासन
प्रतिनिधी/ नवी दिल्ली
बुलेट ट्रेन प्रकल्प ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू होऊ शकतो. भारतात हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतुकीचे साधन विकसित करण्यासाठी आणखी 7-8 वर्षे लागू शकतात. बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू होण्यास विलंब झाल्याची कबुली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली आहे. मंत्री वैष्णव म्हणाले की, महाराष्ट्रात सुरुवातीला काही समस्या होत्या, मात्र आता त्या दूर झाल्या असून बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाबद्दल वैष्णव म्हणाले की, गेल्या दीड वर्षात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे 154 खांब तयार करण्यात आले असून काम वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे, असे रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांनी सांगितले.
हायपरलूप तंत्रज्ञानाबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, हायपरलूप तंत्रज्ञानामध्ये भरपूर क्षमता आहे पण भारतात हे तंत्रज्ञान येण्यासाठी 7 ते 8 वर्षे लागू शकतात. 2023 च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केलेल्या तरतूदीबद्दल अश्विनी वैष्णव म्हणाले की ऐतिहासिकदृष्ट्या रेल्वेसाठी खूप पैसा दिला गेला आहे आणि तो भारताच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती बदलण्यात मोठी भूमिका बजावू शकतो.