केएसआरटीसी अधिकाऱयांच्या उत्तराने आश्चर्य
वार्ताहर /कुद्रेमनी
बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील बाचीपासून शिनोळी औद्योगिक वसाहतीपर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे आम्ही बस सोडणार नाही. जोपर्यंत रस्ता होत नाही तो पर्यंत जादा बसची मागणी करू नका, असे केएसआरटीसीच्या अधिकाऱयांनी कुदेमनी गावच्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सांगितले. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कुदेमनी गाव महाराष्ट्राच्या हद्दीतच आहे. बेळगाव-चंदगड मुख्य रस्त्यापासून दोन-तीन कि.मी.वर हे गाव आहे. या गावच्या चारी बाजूला महाराष्ट्राची हद्द जोडली गेली आहे. तुरमुरीपासून शिनोळीपर्यंत कर्नाटकचा रस्ता आहे, तो रस्ताही खराब झाला आहे. याचबरोबर शिनोळीपासून कुदेमनी क्रॉसपर्यंतदेखील रस्ता खराब झाला असून वाहने चालविणे कसरतीचे बनले आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक शासनाने हा रस्ता केला पाहिजे. मात्र रस्ता खराब आहे म्हणून बस बंद करणे योग्य नाही. कारण कुदेमनी येथून बेळगावला विद्यार्थी मोठय़ा संख्येने येतात. याचबरोबर नागरिकही मोठय़ा प्रमाणात विविध कामानिमित्त, बाजारहाटसाठी येतात. त्यामुळे बसची नितांत गरज आहे. मात्र, रस्ता खराब असल्याचे कारण पुढे करून बस बंद करणे योग्य नाही. तेव्हा आता लोकप्रतिनिधींनीच याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे.