वाई / प्रतिनिधी :
शेतकरी आपल्या शेतात घाम गाळतो. कष्ट करतो. पीक काढतो. त्याच पिकाला बाजारात चार पैसे मिळतील म्हणून नेतो. मात्र, खरेदी केलेल्या मालाचे पैसेच जर व्यापारी वेळेवर देत नसेल तर त्या शेतकऱ्याने करायचे काय? विष खाऊन मरायचे की घरात तुळईला गळफास लावून घ्यायचा, असा यक्ष प्रश्न वाई तालुक्यातील शेतकऱ्यांना पडू लागला आहे. कारण ही तसेच आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांना एका व्यापाऱ्याने गंडा घातला असून, त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन सुद्धा अद्याप त्यास अटक करण्यात आली नाही. नव्याने जांभ येथील 12 शेतकऱ्यांची 12 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
वाई तालुक्यात ऊस आणि हळद ही नगदी पिके मोठय़ा प्रमाणावर घेतली जातात. हळद उत्पादन करणारे शेतकरी मोठय़ा प्रमाणावर आहेत. गावोगावी शेतकऱ्यांमध्ये हळदीसाठी मोठी स्पर्धा सुरू असते. त्यातच हळदीचे कारखाने काही ठिकाणी आहेत. असे असताना याचाच गैरफायदा काही व्यापारी मंडळी उचलतात. त्यात शेतकरी नाहक भरडला जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वाई पोलीस ठाण्यात सूमारे 15 शेतकऱ्यांना फसवणूक झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता जांभ येथील 12 शेतकऱ्यांची त्याच व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामध्ये भुईंज पोलीस ठाण्यात शंकर तुकाराम शिंदे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून, त्यांच्या शेतावरून राजकुमार रमेशचंद्र सारडा (रा.सांगली) याने 24 मार्च 2018 रोजी 4 लाख 21 हजार 765 रुपयांची 45 क्विंटल हळद घेऊन गेला. त्यावेळी त्याने 9 हजार रोख दिले बाकी पैसे नंतर देतो असे म्हणाला. तसेच 12 शेतकऱ्यांना त्याने 8 लाख 71हजार 132 रुपये दिले नाहीत. अशी एकूण 12 लाख 83 हजार 897 रुपयांची फसवणूक केली आहे. याचा तपास हवालदार शिवाजी तोरडमल हे करत आहेत.
अधिक वाचा : ‘मविआ’ला दणका; राज्यपाल नियुक्त आमदारांची ‘ती’ यादी अखेर रद्द
पोलिसांना बाजींदा व्यापारी कसा सापडेना?
बळीराजाला फसवून गायब होणाऱया बाजींदा व्यापाऱ्यावर अनेक तक्रारी वाढल्या आहेत. पोलिसांना गुन्हा दाखल झालेला व्यापारी का सापडत नाही. नेमका हा व्यापारी असा कुठे गेला आहे?, विजय मल्ल्यासारखा तर परदेशी गेला नाही ना की तिथपर्यंत वाईचे पोलीस पोहचू शकत नाहीत, असा ही प्रश्न वाई तालुक्यातील शेतकऱ्यांना पडू लागला आहे.
वाई बाजार समिती करते काय?
वाई कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवषी हळदीचे लिलाव होत असतात. लिलाव झाले की बाजार समितीचे काम झाले का?, बाजार समितीने जर योग्य वेळीच शेतकऱ्यांना चांगला दर दिला असता तर बाहेरचे व्यापारी वाई तालुक्यात आले नसते. शेतकऱ्यांची फसवणूक झाली नसती अशी ही चर्चा सुरू आहे.