महिलांच्या ‘टी20’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा आज अंतिम सामना, ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज
वृत्तसंस्था/ केपटाऊन
महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज रविवारी होणार असून त्यात यजमान दक्षिण आफ्रिकी संघाला ऑस्ट्रेलियाला रोखण्याचा मार्ग सापडल्यास घरच्या मैदानावर त्यांची स्वप्नपूर्ती होऊ शकेल. दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभव करताना प्रशंसनीय लढाऊ वृत्ती दाखवलेली आहे. परंतु विक्रमी पाच वेळा विजेते राहिलेल्या आणि सलग सातव्यांदा अंतिम फेरीत पोहोचलेल्या बलाढ्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी त्यांना सर्व विभागांमध्ये उत्कृष्ट खेळ करावा लागेल.
दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने गेल्या 12 महिन्यांत झपाट्याने प्रगती केली आहे आणि गेल्या वषी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर आता आणखी एका आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच त्यांनी प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेकडे असलेली लॉरा वोल्वार्ड आणि ताझमिन ब्रिट्स ही स्पर्धेतील सर्वोत्तम सलामीच्या जोडींपैकी एक आहे. ब्रिट्स ही कनिष्ठ स्तरावरील माजी जागतिक भालाफेक विजेती राहिलेली आहे.
वोल्वार्ड आणि ब्रिट्स ही दोघेही अव्वल फॉर्ममध्ये आहेत आणि ऑस्ट्रेलियाविऊद्ध विजयी ठरण्याची संधी यजमानांना प्राप्त होण्याच्या दृष्टीने या खेळाडू महत्त्वपूर्ण आहेत. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम खेळ न करूनही भारताला उपांत्य फेरीत पराभूत करण्यात यश मिळविले. अष्टपैलू मॅरिझान पॅप ही दक्षिण आफ्रिकेसाठी आणखी एक महत्त्वाची खेळाडू आहे आणि तिने उपांत्य फेरीत खूप महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुने लुसच्या मते त्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम मारा आहे आणि जेव्हा शबनम इस्माईल आणि अयाबोंगा खाका यासारखी वेगवान गोलंदाजांची जोडी पदरी असेल तेव्हा असे वाटणे साहजिक आहे. स्टेडियमवर उपस्थित राहणार असलेले प्रेक्षक हे संपूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या मागे उभे असतील आणि यजमान संघ शुक्रवारप्रमाणेच त्यांना जल्लोषाची संधी देऊ पाहेल. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेला आरामात पराभूत केलेले आहे. पण ही जेतेपदासाठीची लढत असल्याने ते सावध असतील.
ऑस्ट्रेलियाला जास्त संधी
ऑस्ट्रेलिया हा महिला क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वांत यशस्वी संघ राहिलेला असून त्यांची ताकद पाहता जेतेपद मिळवून वर्चस्व वाढविण्याची त्यांना जास्त चांगली संधी आहे. त्यांच्याकडे फारसे कमकुवत दुवे नाहीत आणि जेव्हा ते दुसऱ्यांदा खेळून धावसंख्येचा पाठलाग करत असतात तेव्हा कोणतेही लक्ष्य सुरक्षित मानता येत नाही. भारताला शेवटच्या पाच षटकांत फक्त 39 धावा हव्या होत्या. पण ऑस्ट्रेलियाने हार मानली नाही आणि सामना आपल्या नावे करण्यासाठी 100 टक्के झोकून दिले. विजेते हे आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नसतानाही जिंकण्याचा मार्ग शोधून काढत असतात आणि मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघ त्यासाठीच ओळखला जातो.
शुक्रवारी इंग्लंडविऊद्ध मिळविलेल्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर ब्रिट्सला ऑस्ट्रेलियाच्या खेळावरील निर्विवाद वर्चस्वाबद्दल विचारले असता ती म्हणाली, शेवटी क्रिकेट हा खूप मजेदार खेळ आहे. ऑस्ट्रेलिया कदाचित अव्वल असेल, पण शेवटी तुम्ही चेंडूला सामोरे जाता, खेळाडूला नव्हे आणि मला वाटते की, आम्ही इंग्लंड संघाविरुद्ध त्याच भावनेने खेळलो. ज्यांच्याविरुद्ध आम्ही नेहमी हरलो त्या इंग्लंडशी आम्ही खेळलो नाही. ज्या उपांत्य फेरीत इंग्लंड हरले ती माझी पहिली उपांत्य फेरी होती आणि इंग्लंडविरुद्ध खेळण्याचीही पहिलीच खेप होती. त्यामुळे आम्ही जशा गोष्टी येतील तसे त्यांना सामोरे जाऊ. पण अंतिम फेरीत खेळण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत, असे तिने सांगितले.
संघ : ऑस्ट्रेलिया-मेग लॅनिंग (कर्णधार), अ?लिसा हिली, डार्सी ब्राउन, अॅशलेग गार्डनर, किम गर्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शुट, अॅनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेरहॅम.
दक्षिण आफ्रिका-सुने लुस (कर्णधार), अॅनेरी डेर्कसेन, मारिझान पॅप, लारा गुडॉल, अयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, शबनीम इस्माईल, ताझमिन ब्रिट्स, मसाबता क्लास, लॉरा वोल्वार्ड, सिनालो जाफ्ता, नॉनकुलुलेको म्लाबा, अॅनिके बॉश व डेल्मी टकर.
वेळ : संध्याकाळी 6.30 वा.