एससीओ परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / ताश्कंद
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवादाच्या मुद्दय़ावर पाकिस्तानला कठोर संदेश दिला आहे. पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत राजनाथ सिंह यांनी दहशतवाद विरोधात एकजूट होत या धोक्याच्या सर्व स्वरुपांना समाप्त करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी सीमेपलिकडून होणारा दहशतवाद समाप्त करण्यात यावा असे म्हटले आहे.
एससीओ सदस्य देशांनी मिळून लढत दहशतवादाचे सर्व प्रकार समाप्त करावेत असे म्हणत राजनाथ सिंह यांनी भारतात हल्ला करण्याचा कट रचणाऱया दहशतवाद्याला अटक केल्याप्रकरणी रशियाचे कौतुक केले आहे. शांततापूर्ण, सुरक्षित आणि स्थिर अफगाणिस्तानला भारताचे समर्थन आहे. याप्रकरणी चर्चेच्या माध्यमातून समन्वय प्रस्थापित केला जाऊ शकतो. अफगाण क्षेत्राला दहशतवादी कारवायांसाठी लाँचिंग पॅड म्हणून वापरले जाऊ नये असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.
सर्वप्रकारच्या दहशतवादाशी लढणे आणि क्षेत्राला शांततापूर्ण, सुरक्षित तसेच स्थिर राखण्याच्या भारताच्या संकल्पाचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद जागतिक शांतता अन् सुरक्षेसाठी सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चीन-पाकिस्तानला कठोर संदेश
एससीओच्या सदस्य देशांसोबत आम्ही संयुक्त संस्थात्मक क्षमता विकसित करू इच्छितो. प्रत्येक देशाच्या भावनांचा आदर करत लोक, समाज तसेच देशांदरम्यान सहकार्याची भावना यामुळे निर्माण व्हावी अशी आमची इच्छा आहे. कुणाकडूनही आणि कुठल्याही उद्देशाने सीमेपलिकडून होत असलेला दहशतवाद हा मानवतेच्या विरोधातील गुन्हा असल्याचे म्हणत राजनाथ सिंह यांनी अप्रत्यक्ष स्वरुपात पाकिस्तानला लक्ष्य केले आहे. चीन आणि पाकिस्तान देखील एससीओचे सदस्य देश आहेत.
अफगाणिस्तानचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकतेचा आदर करणे तसेच त्याच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप न करण्याची गरज आहे. अफगाणिस्तानात अधिकाऱयांना संवाद तसेच चर्चेद्वारे राष्ट्रीय स्तरावर तडजोडीचे वातावरण तयार करण्याची गरज आहे. अफगाणिस्तानात व्यापक, सर्वसमावेशक तसेच प्रतिनिधित्व करणाऱया राजकीय व्यवस्थेची स्थापना व्हावी अशी सूचना संरक्षणमंत्र्यांनी केली.
दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय तसेच प्रशिक्षण देत तसेच आर्थिक मदतीद्वारे हिंसक कारवायांचे समर्थन करत कुठल्याही देशाला धमकाविण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केला जाऊ नये. अफगाणिस्तानच्या जनतेला तत्काळ मानवी मदत उपलब्ध करणे आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांची सुरक्षा करण्याची गरज असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.