नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
दिवाळीपासूनच जोर धरलेल्या थंडीचा कडाका दिवसागणिक वाढू लागलेला आहे. हवामान विभागाने या थंडीचा कडाका कोकण किनारपट्टी भागात आणखीन वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दिवाळीच्या तोंडावर पावसानेही निरोप घेतला. त्यामुळे लांबलेल्या पावसामुळे सर्वत्र वातावरण देखील गारठलेले राहिले. त्यात दिवाळीच्या प्रारंभापासूनच जिल्हय़ात थंडीने जोर धरला. सध्या या थंडीचा जिल्हाभरात चांगलाच कडाका सुरू झाला आहे. ग्रामीण भागात या थंडीचा जोर अधिकच जाणवत असल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने तर आता सागरी पृष्ठभागात तापमान घसरल्याने कोकण किनारपट्टी भागात हलकी ते मध्यम स्वरूपाची थंडी पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.