मनपा-जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष : समस्यांचे निवारण करण्याची प्रशासनाला सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
रस्ते, पाणी आणि विविध नागरी समस्यांबाबत तक्रारी करण्यासाठी जिल्हय़ातील नागरिक जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेतात. निवेदने व विनंती अर्ज देवून समस्यांचे निवारण करण्याची मागणी केली जाते. काहीअंशी समस्यांचे निवारण केले जाते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडेच जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांना खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
शहरातील विविध रस्त्यांवर खड्डय़ाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी सातत्याने केली जाते. महापालिका प्रशासनाने कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेऊन निवेदन दिले जाते. महापालिका व्याप्तीतील अनेक समस्यांबाबत जिल्हाधिकाऱयांकडे तक्रारी केल्या आहेत. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱयांनी समस्यांचे निवारण करण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली आहे. पण जिल्हाधिकारी कार्यालय आवारातीलच समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. काकतीवेस रोड ते टेझरी ऑफिसकडे जाणाऱया गंथालया शेजारील रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. सदर रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने रस्त्याच्या मधोमध चरी निर्माण झाल्या आहेत.
रस्ता दुरुस्तीची मागणी
फलोत्पादन खात्याच्या कार्यालयाशेजारी असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता मध्यभागी खराब झाला असून दोन्ही बाजूंनी चांगला आहे. पण चांगल्या रस्त्यावर चार चाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. परिणामी दुचाकी व अन्य वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भू-मापन खात्याच्या कार्यालयाशेजारी आणि लोकायुक्त कार्यालयासमोर तसेच जुने जि. पं. कार्यालयासमोरील रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या परिसरात वाहनांची वर्दळ असते. तसेच न्यायालय, जिल्हाधिकारी, ट्रेझरी कार्यालय, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत अशा विविध कार्यालयात येणाऱया नागरिकांची संख्या देखील मोठय़ा प्रमाणात आहे. वाहनधारक आणि नागरिकांना रस्त्यांमुळे नाहक त्रास होत आहे. सध्या पावसाचे पाणी साचत असल्याने त्यामधून वाहने गेल्यास खड्डय़ातील पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातीलच समस्यांचे निवारण करण्याकडे महापालिका व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.