पाचजणांना अधिक उपचारासाठी बेळगावला हलवले
खानापूर : सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी गेलेल्या मोदेकोप येथील 40 भाविकांना उलटी व जुलाबाची बाधा झाल्याने रविवारी रात्रीपासून येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. यातील पाच रुग्णांना अधिक उपचारासाठी सोमवारी दुपारी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या भाविकांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी संजय नांद्रे यांनी सांगितले. यासाठी अन्नाचे नमुने तसेच सर्व रुग्णांची रक्त, लघवी, स्टूल, तपासणीसाठी बेळगाव येथे पाठवण्यात आले आहे. सर्वांवर उपचार सुरू असून पुढील तीन दिवस निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोदेकोप येथील भाविक प्रतीवर्षाप्रमाणे यल्लम्मा यात्रेसाठी शुक्रवारी गेले होते. रविवारी धार्मिक विधी आटोपल्यानंतर त्यांनी जेवण केले. या जेवणानंतर काही वेळातच सर्वच भाविकांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांनी सौंदत्ती येथून खानापूर येथे येऊन शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. तर काहीनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. सोमवारी नवे पाच रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याप्रकरणी आरोग्य अधिकारी संजय नांद्रे यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या डॉक्टरांनी या रुग्णावर उपचार केले आहेत. ते अधिकृत डॉक्टर नसून अशा आणीबाणीच्या काळात त्यांनी रुग्णांच्या जिवांशी खेळ करू नयेत, शासकीय रुग्णालयात गॅस्ट्रो संबंधिच्या उच्च दर्जाच्या उपचार यंत्रणा आहेत. यासाठी रुग्णांनीही खासगी रुग्णालयात न जाता शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. रविवारी रात्री शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सर्व रुग्णांवर तातडीने उपचार केल्याने अनर्थ टळला. यावेळी आमदार अंजली निंबाळकर, भाजप नेते प्रमोद कोचेरी, संजय कुबल यासह अनेकांनी रुग्णांच्या उपचारासंबंधी सूचना केल्या.