नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांनी पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या अश्लाघ्य विधानाने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हे हिटलरशाही गाजवत असून हिटलरचा अंत जसा झाला तसाच त्यांचा होईल, असे विधान त्यांनी ट्विटरवरुन केले आहे.
अग्निपथ या केंद्र सरकारच्या योजनेचा विरोध करताना त्यांनी हे विधान प्रसारित केल्याचे समजते. मात्र, काँगेसने त्वरित हे विधान सहाय यांचे व्यक्तिगत असून त्याचा पक्षाशी संबंध नसल्याचे स्पष्ट करत हात झटकले आहेत. भाजप सरकार हे लुटारुंचे सरकार आहे, अशीही टीका सहाय यांनी केली.
काँगेस कार्यकर्त्यांना संदेश
काँगेसने अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी सोमवारी निदर्शनांचे आयोजन पेले होते. निदर्शने करणाऱया कार्यकर्त्यांना संदेश देताना सहाय यांनी केंद्र सरकारविरोधातही आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला. पंतप्रधान मोदी हे रिंगमास्टर आहेत. ते हुकुमशहा बनले आहेत. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. ‘जो हिटलरकी चाल चलेगा, वह हिटलरकी मौत मरेगा’ असा त्यांच्या संदेशाचा आशय आहे. या संदेशावर भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
भाजपकडून प्रतिवार
निराश झालेले काँगेसचे नेते आता मोदींविरोधात निरर्थक शापवाणी उच्चारत असून यातून त्यांचा धीर सुटला आहे, हे दिसून येते. अशा प्रकारची तीरस्कारयुक्त विधाने करुन काँग्रेस स्वतःची प्रतिमा अधिकच बिघडवून घेत असल्याचा प्रतिवार भाजपने केला. 15 वर्षांपूर्वी सोनिया गांधींनी ‘मौत के सौदागर’ असा उल्लेख केल्यापासून काँगेसचीच घसरण सुरु झाल्याचीही आठवण भाजपने करुन दिली.
आक्षेपार्ह विधानांच्या 80 घटना
पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह विधाने करण्याची जणू चढाओढ विरोधी पक्षनेत्यांमध्ये लागली आहे, असे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये अशा प्रकारची 80 हून अधिक विधाने करण्यात आली आहेत.