सत्ताधाऱयांकडून विरोधकांची खिल्ली उडविण्याचे प्रकार : आम आदमी पार्टीचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
भाजप सत्ताकाळात विधानसभा अधिवेशनाचे गांभीर्य हरवू लागले आहे. विरोधी आमदारांची थट्टा करणे, खिल्ली उडवणे व त्याद्वारे त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे यासारखे प्रकार वाढीस लागले आहेत, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश यांनी केला आहे. लोकशाही व्यवस्थेत असे प्रकार राज्यहितासाठी बाधक ठरू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमचे दोन आमदार प्रथमच विधानसभेत पोहोचले. नुकत्याच संपलेल्या दहा दिवसांच्या अधिवेशनात पदापर्णातच आम्ही चांगली कामगिरी बजावली. सर्वाधिक 306 प्रश्न आम्हीच विचारले आणि यातील अनेक प्रश्नांद्वारे सरकारला अडचणीत आणण्यातही आम्ही यशस्वी ठरलो. आमचे प्रश्न केवळ मतदारसंघापूरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्याच्या हिताच्या दृष्टीने विचारण्यात आले होते. निवडणूक काळात आणि तत्पूर्वी लोकांना दिलेल्या आश्वासनांना अनुसरून हे प्रश्न होते. महत्वाचे म्हणजे यातील बरेच प्रश्न राज्याच्या विविध भागातील नागरिकांनीच आमच्याकडे पाठविले होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही गोमंतकीयाचा आवाज बनण्याचे प्रयत्न केले, असे व्हिएगश यांनी सांगितले.
परंतु अधिवेशन काळातील एकुणच अनुभव मात्र कटू म्हणावा असाच होता. एकतर आमच्या प्रश्नांना उत्तरे देताना सरकारला म्हणावे तेवढे गांभीर्य नसल्याचे जाणवत होते. त्याशिवाय सर्वात दुःखद बाब म्हणजे अपूर्ण किंवा चुकीची उत्तरे देणे, विषयांना बगल देणे, उत्तरे देण्याचे टाळणे आणि त्याही पलिकडे जाताना विरोधकांची चेष्टा-थट्टा करून मानसिक खच्चीकरणाचे प्रयत्न करणे, यासारखे प्रकार दिसून आले असे व्हिएगश म्हणाले.
अधिवेशनादरम्यान आम्ही आरोग्य, शिक्षण, वीज यासारख्या क्षेत्राशी संबंधित असंख्य मुद्यांवर भर दिला. अर्थसंकल्पातील 25टक्के निधी शिक्षणासाठी राखीव ठेवावा, कोमुनिदाद कायद्यात सुधारणा करावी यासारख्या सूचना, मागण्या आम्ही केल्या. परंतु सत्ताधारी पक्षाकडून म्हणण्यापेक्षा स्वतः मुख्यमंत्र्यांकडून आमची खिल्ली उडविण्याचे प्रयत्न झाले. त्यातून अनेक प्रश्नांची उत्तरेच मिळाली नाहीत. तरीही सततच्या पाठपुराव्यामुळे काही गोष्टींच्या संदर्भात किमान आश्वासन तरी मिळवू शकलो, असे व्हिएगस म्हणाले.
या पत्रकार परिषदेला त्यांच्या सोबत उपस्थित असलेले आमदार क्रूझ सिल्वा यांनी बोलताना, विधानसभा अधिवेशनात वेळ्ळीतील लोकांच्या समस्या, मागण्या प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मांडण्यात आल्या. त्यामुळे आपले मतदार खूप आनंदी आहेत, असे सांगितले.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी बोलताना, आमचे केवळ दोनच आमदार विधानसभेत पोहोचले असले तरी त्यांनी सर्वाधिक प्रश्न उपस्थित करून ’गोमंतकीयांचा आवाज’ म्हणून क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केल्याचे सांगितले. त्याबद्दल दोन्ही आमदारांचे त्यांनी अभिनंदन केले.
पक्षाचे उपाध्यक्ष रामराव वाघ यांनी बोलताना, प्रमुख विरोधी पक्ष जेथे अपेक्षेप्रमाणे भूमिका बजावू शकला नाही तेथे प्रथमच विधानसभेत पोहोचलेल्या आपच्या आमदारांनी उत्कृष्ट कामगिरी केली, असे गौरवोद्गार काढले. सरकारला घेरण्यात विरोधक कमी पडले तेथे ’आप’चे आमदार सरस ठरले. या आमदारांमध्ये गोव्याच्या उज्वल भविष्यासाठी काम करण्याची तळमळ आहे. त्यामुळे त्यांनी सूचविलेल्या मुद्यांवर सरकारने विचार करावा, असे आवाहन वाघ यांनी केले.