धरणातून दहा हजार 100 क्युसेक विसर्ग सुरू, कोयना-कृष्णाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढू लागली आहे. परिणामी धरणाची निर्धारित पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी 12 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उघडून 8000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारपासून धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक विसर्ग चालू असल्याने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण दहा हजार 100 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी कोयना नदी दुथडी भरून वाहू लागल्याने कोयना व कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात 88.97 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणात प्रतिसेकंद 49 हजार 524 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे 162 (3302), नवजा येथे 127 (3897), तर महाबळेश्वर येथे 288 (4247) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
…तर आणखी दरवाजे उघडणार
कोयना पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र सायंकाळनंतर पावसाचा जोर अधिक वाढल्यास धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्याची शक्यता आहे. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यास विसर्ग कमीही होण्याची शक्यता कोयना सिंचन विभागाकडून व्यक्त करण्यात आली.