‘मंकीपॉक्स’ने आता भारतातही प्रवेश केला असून, केरळपाठोपाठ दिल्लीतही या आजाराचा रुग्ण आढळल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे देशातील ‘मंकीपॉक्स’ग्रस्तांची संख्या चारवर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या हाताच्या बोटावर मोजता येणारी असली, तरी वाढू नये, याकरिता पुढच्या काही दिवसांमध्ये देशाला कमालीची सतर्कता बाळगावी लागेल. मागची दोन वर्षे अवघ्या जगाला कोरोनाने घट्ट विळखा घातला होता. या महामारीत कोटय़वधी लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यातून सावरत असतानाच आता नव्या विषाणूने सर्वदूर हातपाय पसरायला सुरुवात केल्याने चिंता वाढली आहे. जगातील जवळपास 75 देशांमध्ये या आजाराचे 16 हजारांवर रुग्ण सापडले आहेत. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. ही नक्कीच धोक्याची घंटा ठरावी. स्वाभाविकच जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘मंकीपॉक्स’ला सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जगातील प्रत्येक देशाने आता या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे. भारतात ‘मंकीपॉक्स’चा पहिला रुग्णही केरळात आढळला असून, तो युएईतून परतल्याचे सांगितले जाते. केरळपाठोपाठ दिल्लीतही या आजाराचा रुग्ण सापडला असून, या 34 वर्षीय व्यक्तीने कुठेही परदेश प्रवास केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हिमाचल प्रदेशमधील मनाली येथील बॅचलर पार्टीत सहभागी झालेल्या या रुग्णाला ‘मंकीपॉक्स’ची बाधा कशी झाली, हे समजू शकलेले नाही. परंतु, या उदाहरणातून आपल्याला या पातळीवर कमालीची दक्षता बाळगावी लागेल, हे सूचित होते. त्यादृष्टीने देशातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली असून, संसर्गाचे मूळ शोधण्यासह संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, त्यांची तपासणी व विलगीकरण करणे यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमानतळे, बंदरे येथे प्रवाशांची आरोग्य तपासणी कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आजमितीला परदेशात या आजाराचा अधिक प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे परदेश प्रवासावर निर्बंध आवश्यक ठरतात. तेथून येणाऱया प्रत्येक प्रवाशाची काटेकोर तपासणी ही व्हायलाच हवी. जेणेकरून इतरांना संबंधितांपासून संसर्ग होऊ नये. ‘मंकीपॉक्स’चा संसर्ग हा संसर्गित प्राण्यांपासून प्रत्यक्ष अथवा प्रत्यक्षरीत्या संपर्कामुळे होतो. ताप येऊन अंगावर पुरळ येणे, खोकला, लसिका ग्रंथींना सूज, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, ही या आजाराची सर्वसाधारण लक्षणे आहेत. नाकावाटे बाहेर पडणारे घटक, संसर्गित त्वचा, शरीर वा जखमेतील स्राव, रुग्णाचे कपडे, जखमांना बांधलेला कापूस वा वस्त्रे हाताळणे, यांद्वारेही या रोगाचा संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज अधोरेखित होते. मुख्य म्हणजे हा रोग सहा ते 13 दिवस सुप्तावस्थेत राहत असल्याचे आढळून आले आहे. तर त्यानंतर तापासह अंगावर व्रण व जखमा होण्यास सुरुवात होते. ही अवस्था दोन ते चार आठवडे किंवा त्यापेक्षाही अधिक काळ राहू शकते. त्यानंतर फोड व व्रणांना खाज सुटून बरे होण्याची प्रक्रिया सुरू होते. या आजाराचा मृत्यूदर 3 ते 6 टक्क्यांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. किंबहुना, मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण तुलनेत अधिक असल्याचे पहायला मिळते. हे पाहता मुलांच्या बाबतीत अधिक दक्षता घेतली गेली पाहिजे. आरोग्य यंत्रणेने एकूणच यासंदर्भात काय काळजी घ्यावी, याबाबत सूचना केल्या आहेत. कोरोनासाठी जे सुरक्षेचे नियम निश्चित करण्यात आले आहेत, त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे हातांची स्वच्छता, मास्कचा वापर, बाधित व्यक्तीच्या अंथरुण पांघरुणाशी संपर्क टाळणे, विलगीकरण, यांसह अन्य गोष्टींचे जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकानेच अनुकरण करणे क्रमप्राप्त ठरते. अर्थात ‘मंकीपॉक्स’ला न घाबरता त्याची दुसरी बाजूही ध्यानात घेतली पाहिजे. कोविड कृती गटाचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, ‘मंकीपॉक्स’ हा आजार तुलनेत कमी संसर्गजन्य आहे. त्याचबरोबर तो अतिशय कमी प्राणघातक आहे. त्यामुळे त्याची भीती बाळगण्याचे काही कारण नाही. केवळ ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे ते सांगतात. हे दिलासादायक होय. मात्र, मधुमेह वा अन्य काही आजार असलेल्यांनी अधिकची काळजी घ्यायला हवी. मुळात हा काही नवीन विषाणू नाही, जगात गेल्या 50 वर्षांपासून तो अस्तित्वात आहे. त्यामुळे त्याची रचना, संक्रमण आणि संसर्गजन्यतेविषयीची माहिती शास्त्रज्ञांकडे उपलब्ध आहे. म्हणूनच याला नियंत्रणात ठेवणे सोपे आहे, असा दावा संसर्गरोगतज्ञ चंद्रकांत लहरिया करतात. त्याचबरोबर यासाठी देवी रोगप्रतिबंधक लस वापरता येऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. साहजिकच ‘मंकीपॉक्स’बद्दल भय बाळगण्याचे कारण नाही. तथापि, त्याबाबत बेफिकीरही राहता कामा नये. कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. रुग्णसंख्या कमी असली, तरी अजूनही काही जणांना या आजाराची बाधा होत असल्याचे दिसून येते. त्यातच स्वाईन फ्लू, डेंगी, चिकनगुनिया, मलेरियाचे रुग्णही प्रामुख्याने विविध शहरांमध्ये आढळून येत आहेत. पावसाळी वातावरण, हवामानातील चढउतार, साचलेले पाणी, त्यातून वाढलेली डासोत्पत्ती यातून या साथीच्या आजारांनी सर्वत्र विळखा घातला आहे. मागच्या दोन वर्षापासून ऑनलाईन अभ्यास करणारा विद्यार्थीवर्ग या वर्षीपासून शाळेत जाऊ लागला आहे. मात्र, शहरोशहरी अनेक विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला, तापासह साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. आता नव्या आजाराने दार ठोठावल्याने विशेषतः मुलांना जपावे लागेल. शाळांनाही त्यादृष्टीने उपाययोजना आखाव्या लागतील. लढणे, हा मानवाचा स्वभावगुण असल्याने ‘मंकीपॉक्स’वरही नक्कीच मात करता येईल. मात्र, आपल्याला यापुढे पर्यावरणाचाही विचार करावा लागेल.
Previous Articleभारतामध्ये गुगल स्ट्रीट व्यू सादर
Next Article कांगोमध्ये बीएसएफचे दोन जवान हुतात्मा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.