सर्वोच्च न्यायालयाने दूर केली महत्वाची समस्या
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाचे जे पीठ मोठे असेल त्याने दिलेला निर्णयच लहान पीठाने दिलेल्या निर्णयापेक्षा ग्राहय़ मानला जाईल, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मोठय़ा पीठाने बहुमताचा निर्णय दिला असला आणि लहान पीठामध्ये हा बहुमताचा निर्णय देणाऱया न्यायाधीशांपेक्षा संख्येने जास्त न्यायाधीश असले तरीही मोठय़ा पीठाचाच निर्णय मानला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादित पेले आहे की, एखादे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या पीठाकडे असले आणि या पीठाने सर्वानुमते, अर्थात एकमुखाने निर्णय दिला असला आणि त्याच प्रकरणात नंतर सात न्यायाधीशांच्या पीठाने 4 विरुद्ध 3 असा निर्णय दिला तरीही मोठय़ा पीठाचा, अर्थात सात न्यायाधीशांच्या पीठाचाच निर्णय ग्राहय़ मानला जाईल. लहान पीठाचा निर्णय देणाऱया न्यायाधीशांची संख्या जास्त असली तरी त्याने दिलेल्या निर्णयापेक्षा बहुमताने पण कमी संख्येने दिलेला मोठय़ा पीठाचा निर्णय मान्य केला जाईल. कारण हा प्रश्न विशिष्ट निर्णय देणाऱया न्यायाधीशांच्या संख्येपेक्षा पीठाचा स्तर कोणता आहे यावर अवलंबून आहे, असेही न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील पीठाने स्पष्ट केले. हा प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाकडून उपस्थित झाला होता.