आंध्रप्रदेश राज्यात गाढवाच्या मांसाची मागणी वाढत आहे. गाढवाचे मांस शक्तीवर्धक असते असा समज या वाढीसाठी कारणीभूत आहे. तथापि वैद्यकीय तज्ञांच्या संशोधनानुसार गाढवाच्या मांसामध्ये असे कोणतेही शक्तीवर्धक गुणधर्म नसतात तरीही ही मागणी वाढत आहे. कायद्यानुसार मांसासाठी गाढवाची हत्या करणे हा गुन्हा असून त्यासाठी पाच वर्षांच्या कारवासाची शिक्षा आहे. मात्र कायदाही धाब्यावर बसवून काही ठिकाणी मांसासाठी गाढवांची हत्या केली जात आहे. आंध्रप्रदेशमध्ये अशा मांसाचे साठे जप्त करण्यात आले आहेत.
गाढवाचे मांस खाण्याचा प्रारंभ अगदी अलीकडच्या काळात म्हणजे 2010 पासून झाल्याचे दिसून येते. या मांसाच्या सेवनामुळे सेक्सपॉवर वाढते, अशी भ्रामक समजूत पसरविण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण गाढवांच्या जीवावर उठले आहेत. गेल्या 10 वर्षांत देशभरात गाढवांची संख्या 56 टक्के कमी झाली असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. ही स्थिती न सुधारल्यास ही प्रजाती नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजवर या मांसावर अनेक विद्यापीठांमध्ये आणि प्रयोग शाळांमध्ये संशोधन झाले आहे. या मांसात कोणताही विशेष शक्तीवर्धक किंवा रोगप्रतिकारक असा गुणर्धम आढळलेला नाही. केवळ गैरसमजुती पोटी गाढवाचे मांस खाण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.
गाढवाचा उपयोग पूर्वीच्या काळी प्रामुख्याने शेती आणि वाहतुकीच्या कामासाठी होत असे. अलीकडच्या काळात या प्राण्याचा हा उपयोग कमी झालेला आहे. तथापि गाढवाचे दूध, मांस आणि रक्त यांच्यात रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे सामर्थ्य असल्याचा गैरसमज हेतूपुरस्सर पसरविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या हत्येचे प्रमाण वाढलेले आहे. लोकांनी अशा भ्रामक समजुतीपासून दूर रहावे आणि एका निरुपद्रवी प्रजातीला संपण्यापासून वाचवावे असे तज्ञांचे आवाहन आहे.