पाकिस्तानच्या वजीरे आजम पदावरून अखेर इम्रान खान यांना शनिवारच्या मध्यरात्री पायउतार व्हावे लागले. हा अग्रलेख वाचला जात असताना कदाचित विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ नवे वजीरे आजम निवडले असतील. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार असे सांगणाऱया इम्राननी आपल्यावरील अविश्वास ठरावाची चर्चा होण्यापूर्वीच मैदानातून पळ काढला. अविश्वासावर मतदान होताना ते त्यांच्या पक्षाचे खासदार गैरहजर राहिले. सर्वोच्च न्यायालयानेही इम्रान खान यांची खेळी उधळून लावली. पंजाब आणि सिंध प्रांताचे वर्चस्व असणाऱया आणि आलटून पालटून देशात सत्तेवर येणाऱया दोन प्रमुख पक्षांना देशद्रोही ठरवत, भ्रष्टाचाराच्या आणि महागाईच्या विरोधात आवाज उठवत, इम्रान सत्तेवर आरूढ झाले होते. त्या काळात प्रचारात त्यांनी भारताबरोबर मैत्रीचा सूर आळवला होता. मात्र नंतर रंग बदलले. देशात महागाई आणि भ्रष्टाचाराच्या शिगेला पोहोचला असताना त्यांना धर्माचीही आठवण झाली. जगभरातील इस्लामचे आपणच मसिहा आहोत असे भासवण्याचाही प्रयत्न झाला. पाकिस्तानी लष्कराचा आपल्या विरोधात कट सुरू आहे, असेही वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वर्षभर एक-एक नेते सत्ताधारी पक्ष सोडत असताना आणि जेव्हा विरोधकांची एकजूट होते आहे असे लक्षात आले तेव्हा त्यांनी आणखी नवे आरोप केले. आपणास पदच्युत करण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप करण्यास ते विसरले नाहीत. धर्मांध दृष्टीकोन आणि काश्मीरसाठी दहशतवाद्यांना खतपाणी घालण्याच्या राजकारणाने पाकिस्तानला गेल्या साडेसात दशकांमध्ये दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आणून उभे केले आहे. भुत्तो आणि झरदारी परिवाराचे नेतृत्व करणारे बिलावल अली भुत्तो-झरदारी असोत किंवा नवाज शरीफ यांचा वारसा पुढे नेणारे त्यांचे लहान बंधू शाहबाज शरीफ असोत या सर्वांनाच पाकिस्तानी जनतेने अवघ्या साडेतीन वर्षांपूर्वी नाकारले होते. मोठय़ा विश्वासाने इम्रान यांच्या हाती देशाची सूत्रे सोपवली होती. क्रिकेटचे मैदान गाजवणारा हा उमदा खेळाडू जगभर पाकिस्तानचे नाव गाजवेल आणि दुरवस्थेतून देशाला बाहेर काढेल अशी जनतेची भाबडी आशा होती. पण राज्य करण्यास अपात्र क्रिकेटपटूने खुर्ची वाचवण्याचा खेळ केला. पाकिस्तानच्या लष्करा विरोधात मोहीम उघडण्याचे धाडस करणारा हा पहिलाच वजीरे आजम, पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच लोकशाही मार्गाने प्याद्यासारखा पदच्युत झाला! ते आता नव्या सरकारला मानायला तयार नाहीत. पण पाकिस्तानची व्यवस्था लक्षात घेता इम्रान यांचे बंड टिकणे अवघड. नव्या सरकारच्या पाठीशी अमेरिका आहे. रशिया व चीन प्रकरणात आपण त्यांना साथ दिली नाही म्हणून आपल्याला पदावरून दूर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमेरिकेने याचा इन्कारही केला आहे. यापूर्वी लष्करानेही सरकार घालवण्यात आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे कदाचित पहिल्यांदाच पंतप्रधानाला लोकशाही मार्गाने हटवले गेले! अन्यथा राष्ट्रप्रमुखाला थेट फासावर चढवण्याचा आणि लष्करप्रमुखांनी देशाचा ताबा घेण्याचा पाकिस्तानला मोठा अनुभव आहे. बिलावल भुत्तो झरदारी यांनी तर 10 एप्रिल 1973 रोजी पाकिस्तानची राज्यघटना मंजूर झाली आणि बरोबर एकोण पन्नास वर्षांनी इम्रान यांना पदच्युत करून जुन्या पाकिस्तानातील लोकशाही राजवट सुरू झाली असे वक्तव्य केले आहे. इम्रान खान लष्कराच्या मदतीने सत्तेवर आले होते. त्यांच्या आधीचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना जिवाच्या भयाने पद सोडून पळून जावे लागले होते. त्यांच्या जगण्याची शाश्वती अमेरिकेने पाकिस्तानकडून घेतली होती! इम्रान यांना दिलेला इतर कोणताही शब्द पाळता आला नाही. भ्रष्टाचाराचा किंवा आर्थिक प्रश्न अधिकच बिकट होत गेला. कर्जाचे आणि त्यावरून व्याजाचे ओझे वाढत वाढत देश रसातळाला पोहोचला. भारताचे तीन शेजारी पाकिस्तान, म्यानमार आणि श्रीलंका गंभीर संकटाला सामोरे जात आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या राष्ट्र प्रमुखांनी त्यांच्या जनतेला मोठी मोठी स्वप्ने दाखवली, अवास्तव कल्पना आणि लोककल्याणाची आश्वासने देऊन मनमानी कारभार केला. परिणामी हे देश रसातळाला पोहोचले आहेत. देशातील पारंपरिक राज्यकर्त्यांना किंवा एखाद्या व्यवस्थेला सांभाळून कारभार करणाऱया लोकांना नावे ठेवणे सोपे असते. मात्र देश चालविण्याची जबाबदारी जेव्हा त्यांच्यावर पडते तेव्हा जर राष्ट्राचाच नायनाट होणार असेल तर अशा स्वप्न दाखवणाऱयांच्या पाठीशी जनतेने धावावे का? हा प्रश्नच असतो. हिटलरच्या स्वप्नाला भुलून जर्मनीचे वाटोळे झाले. तसेच प्रकार जगातील वेगवेगळय़ा देशांमध्ये सातत्याने दिसून येतात. त्याचे रूपांतर हुकूमशहात होऊ लागते आणि ज्या राष्ट्राच्या हिताच्या गप्पा मारल्या होत्या त्याच राष्ट्रातील जनतेला गुलाम बनवण्याचे प्रयत्न सुरू होतात. हे जगाने अनेक प्रकरणांमध्ये अनुभवले आहे. आजच्या काळात आर्थिक नाडय़ा आवळल्यानंतर एखादे राष्ट्र कसे कोसळून पडू शकते याची अनेक उदाहरणे सध्या दिसत आहेत. अशा काळात राष्ट्र आणि राष्ट्रातील जनतेच्या हिताचा विचार करून कारभार करणे आणि प्रत्येक निर्णयाचा काय परिणाम होऊ शकेल याचा दूरदृष्टीने विचार करणाऱया लोकांच्या समूहाचा राज्यकारभारासाठी उपयोग करून घेणे आवश्यक बनते. पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या राज्यकर्त्यांनी आपण जणू ईश्वरी अवतार आहोत आणि सर्व परिस्थितीतून देशाला बाहेर काढू शकतो अशा पद्धतीने कारभार केला आणि त्याची फळे त्यांचा देश भोगतो आहे. ज्या नवाज शरीफ यांना पिटाळून लावण्यात आले त्यांच्या भावाला आता सत्ता बहाल केली जात आहे. पाकिस्तानातील असे सगळेच प्रयोग कधी ना कधी फसलेले आहेत. देशाची कमकुवत घटना, सत्तेचा अमर्याद वापर करणारे हुकूमशहा राज्यकर्ते आणि लष्करशहा आणि त्यांच्या पाठीशी असणारे मूठभर श्रीमंत जेव्हा देशा ऐवजी स्वतःचाच विचार करून कारभार करतात तेव्हा त्या देशाचा श्रीलंका आणि पाकिस्तान होतो. त्यामुळे एक वजीर पदच्युत केला आणि दुसरा बसवला तरी तो चांगली व्यवस्था निर्माण करेल का? हा प्रश्न उरतोच.
Previous Articleकोणती सिद्धी कशी प्राप्त होते ?
Next Article 30 घरे-दुकानांची मध्यप्रदेशमध्ये जाळपोळ
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.