बैठकीकडे तालुक्याचे लक्ष, कॉ. प्रा. सुभाष जाधव यांची माहिती
कार्वे/वार्ताहर
अथर्व दौलत साखर कामगारांचा विविध न्याय मागण्यांसाठी १९ ऑगस्ट २०२२ पासुन बेमुदत संप सुरू आहे. या संबंधी जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप करून सर्व संबंधीतांची एक बैठक घेतली. त्यामध्ये दिलेल्या निर्देशा प्रमाणे औद्योगिक न्यायालयातील केस संयुक्तपणे काढुन घेण्यात आली आहे. तसेच दि.३०/०८/२०२२ रोजी अथर्व व्यवस्थापन व युनियन यांची एक बैठक झाली. त्यामध्ये कांही मुद्यावर सहमती झाली. परंतु प्रमुख मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही. आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार दि. १९ रोजी बैठक बोलावली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या सुचने प्रमाणे प्रांताधिकारी गडहिंग्लज यांनी संबंधीतांची एक बैठक बोलावली. परंतु त्या बैठकीस अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे हे उपस्थित राहीले नाहीत. त्यामुळे त्या बैठकीतही कोणताही निर्णय झाला नाही. त्यानंतरच्या १०-१२ दिवसात मानसिंग खोराटे यांनी युनियन बरोबर चर्चा केलेली नाही. औद्योगिक न्यायालयात युनियन बरोबर चर्चा करून करार करण्याचे त्यांनी मान्य केले असतानाही त्याचे ते पालन करत नाहीत. हे गंभीर आहे. त्यामुळे संप लांबला असुन आज त्याचा २९ वा दिवस आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना विनंती केल्याने पुन्हा एकदा तोडग्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 19 रोजी सायंकाळी 6 वाजता बैठक बोलाविणेत आली आहे. या बैठकीत सर्वसमावेशक तोडगा निघेल अशी आशा प्रा सुभाष जाधव यांनी व्यक्त केली आहे.
बैठकीकडे तालुक्याचे लक्ष
गेले 29 दिवस दौलत साखर कारखान्याच्या कामगारांचा संप सुरू आहे हा संप मिटावा व यशस्वी तोडगा निघावा यासाठी संपूर्ण तालुका जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सोमवारी होणाऱ्या बैठकीकडे लक्ष ठेवून आहे. किमान या बैठकीत तरी यशस्वी तोडगा निघावा अशी अपेक्षा येथील सर्वसामान्य शेतकरी करून आहे.