करणे भाग पडेलच, तर अधिवेशन पुढे पूर्ण करावे : आमदार विजय सरदेसाई यांची मागणी
प्रतिनिधी /मडगाव
पावसाळी विधानसभा अधिवेशन पूर्ण क्षमतेने होणार असल्याने आम्ही लोकांच्या हिताचे कित्येक प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे पंचायत निवडणुकांच्या नावाखाली हे अधिवेशन कमी करण्यात येऊ नये व करणे भाग पडले, तर ते पुढे सुरू करून पूर्ण करावे, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारला केली आहे. संडे डायलॉगच्या अंतर्गत फातोर्डातील उर्वरित प्रभागांतील जनतेच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना सरदेसाई यांनी वरील मागणी उचलून धरली.
भू-गटार, रस्ते, वीज यासारख्या जनतेच्या मूलभूत समस्यांवर आधारित प्रश्न आमदार या नात्याने आम्ही उपस्थित करतो. त्यामागे त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न असतो. पुरवणी मागण्यांवर बोलताना कित्येक विषय विस्तारित स्वरूपात संबंधित मंत्र्याकडे मांडून त्यांच्याकडून आश्वासन घेऊन कामांची पूर्तता करता येते. त्यामुळे पूर्णवेळ अधिवेशनाची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कित्येक वर्षांनंतर यंदा हे पावसाळी अधिवेशन पूर्ण स्वरूपात होणार आहे. यासाठी आम्ही कित्येक प्रश्न मांडलेले आहेत. एखादेवेळी ते कमी करण्याची पाळी आल्यास हेच अधिवेशन पुढे चालू ठेवावे आणि शिल्लक प्रश्न त्यात घ्यावेत, असे सरदेसाई यांनी सरकारला सूचित केले आहे. आपण कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा विषय मांडणार आहे व आपली बाजू ठेवणार आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.
सध्या डेंग्यूची साथ वाढली आहे. आपल्या मतदारसंघात पाजीफोंड येथे रुग्ण आढळत आहेत. यावर मदतीसाठी डेंग्यू हेल्पलाईन क्रमांक असला पाहिजे. ही मागणी आम्ही विधानसभेत सविस्तर मांडून ती पूर्ण करून घेऊ शकतो. सध्या सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने वाहतूक नियम उल्लंघन तसेच चोरी-दरोडे यासारखे गुन्हे घडतात तेव्हा पोलिसांना दुकानदार वा अन्य एखाद्याकडे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयांवर अवलंबून राहावे लागते ही वस्तुस्थिती आहे. हे प्रश्न आम्ही कुठे मांडणार व त्यावर तोडगा कसा निघणार. यासाठी पूर्णवेळ विधानसभा अधिवेशन हे अत्यंत गरजेचे आहे. कारण यातून जनतेच्या समस्यांचा पाठपुरावा करण्यास मिळतो. यात कसलेही राजकारण नाही, असे आमदार सरदेसाई यांनी स्पष्ट केले.