प्रशांत किशोर यांनी साधला निशाणा ः
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची ‘जन सुराज यात्रा’ सुरू झाल्यावर राजकीय वातावरण तापले आहे. विशेषकरून प्रशांत किशोर आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात वाप्युद्ध सुरू आहे. नितीश कुमार यांनी शनिवारी प्रशांत किशोरांकडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला मिळाला होता असा दावा केला होता. नितीश यांच्या या दाव्यानंतर प्रशांत किशोर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितीश कुमार यांच्यावर वाढत्या वयाचा प्रभाव दिसू लागला आहे, ते काहीतरी वेगळे बोलू इच्छित आहेत, परंतु तोंडातून शब्द वेगळेच बाहेर पडत असल्याची टीका किशोर यांनी केली आहे.
जर मी भाजपच्या अजेंडय़ावर काम करत असतो, तर काँग्रेस बळकट करण्यास कसे सांगितले असते? नितीश कुमार यांना भ्रम होत असून राजकीयदृष्टय़ा ते एकाकी पडत चालले आहेत. विश्वास ठेवता येणार नाही अशा लोकांच्या विळख्यात ते सापडले असल्याची टीका प्रशांत किशोर यांनी केली आहे.
नितीश यांच्यावर वयाचा प्रभाव आता दिसू लागला आहे. त्यांना बोलायचे काहीतरी वेगळे असते, परंतु दुसरे काहीतरीच बोलून जात आहेत. भाजपच्या अजेंडय़ानुसार मी काम करतोय असे त्यांचे म्हणणे आहे. याचबरोबर नितीश यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिल्याचे ते सांगत आहेत. या दोन्ही गोष्टी एकत्र कशा शक्य आहेत असे प्रश्नार्थक विधान करत प्रशांत यांनी नितीश कुमारांना लक्ष्य केले.
भाजपच्या अजेंडय़ावर काम करत असल्यास मी काँग्रेसला बळकट करण्यास का सांगेन? पहिला दावा खरा असल्यास साहजिकच दुसरा दावा चुकीचा असणार. यातून बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर वयाचा प्रभाव दिसून येत असल्याचे स्पष्ट होते. नितीश कुमार आता राजकीय स्वरुपात एकटे पडले असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
नितीश कुमारांचा दावा
प्रशांत किशोर हे भाजपसाठी काम करत आहेत. प्रशांत हे अलिकडेच स्वतःहून मला भेटायला आले होते. मी त्यांना निमंत्रित केले नव्हते. प्रशांत किशोर यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. चार-पाच वर्षांपूर्वी त्यांनी संजद काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला होता आणि आता ते भाजपसाठी काम करत असल्याचा नितीश कुमार यांनी केला होता.