18 डिसेंबरला मतदान, तर 20 डिसेंबरला मतमोजणी, नागरी क्षेत्र वगळता जिल्हय़ात आचारसंहिता
प्रतिनिधी/सांगली
जिल्ह्यातील 452 ग्रामपंचायतींचे बिगूल बुधवारी वाजले. नागरी क्षेत्र वगळता आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. येत्या 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यावेळी थेट जनतेमधून सरपंच निवड होणार असल्याने चांगलीच चुरस निर्माण होणार आहे.
ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या 452 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. नागरी क्षेत्र वगळता संपूर्ण जिल्ह्यात बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली असल्याचेही जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी वाळवा तालुक्यात सर्वाधिक 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील. गत निवडणुकीप्रमाणे यंदाही थेट सरपंच पदासाठी निवडणूक चुरशीने होईल. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम असल्याने गावातील राजकारण आतापासून तापले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपून आठ महिने झाले तरी अद्याप निवडणूक झालेली नाही. निवडणूक आयोगाने ऑक्टोंबर आणि नेव्हेंबर महिन्यात मुदत संपणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घेण्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे महिन्याभरापासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या 452 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम 21 ऑक्टोंबरला जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानुसार 452 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची 18 नोव्हेंबर रोजी नोटीस प्रसिध्द करतील. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा 28 नोव्हेंबर (सोमवार) ते 2 डिसेंबर (शुक्रवार) सकाळी 11 ते दुपारी 3. अर्जांची छाननी 5 डिसेंबर (सोमवार) सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदत 7 डिसेंबर (बुधवार) दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द त्याचदिवशी प्रसिद्ध होईल. आवश्यक असल्यास मतदान 18 डिसेंबर (रविवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 तर मतमोजणी 20 डिसेंबर (मंगळवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दि. 23 डिसेंबर राहिल.
बुधवारपासूनच आचारसंहिता
निवडणूक लागलेल्या गावांमध्ये बुधवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यामध्ये 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. त्यामुळे संपूर्ण जिह्यामध्ये आचारसंहिता लागू राहील. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या सीमेलगतच्या गावांमध्येसुध्दा आचारसंहिता लागू राहील.
आचारसंहिता ही केवळ ग्रामीण क्षेत्रासाठी लागू असेल. महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत या नागरी स्वराज्यसंस्थांच्या क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू नाही. ग्रामपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पडेल, अशा प्रकारची कोणतीही कृती अगर भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू आहे. या क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती घोषणा आचारसंहिता कालावधीत केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हा निवडणूक अधिकाऱयांनी दिला आहे.
वाळव्यात 88 तर जतमध्ये 81 ग्रामपंचायती
ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत 452 ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने निवडणूक होत आहे. वाळवा तालुक्यातील सर्वाधिक 88 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होईल. त्यापाठोपाठ जत तालुका 81, मिरज 38, आटपाडी 26, कडेगाव 43, कवठेमहांकाळ 29, खानापूर 45, पलूस 16, शिराळा 60, तासगाव 26 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. गत निवडणुकीप्रमाणे यंदाही थेट सरपंच पदासाठी निवडणूक होईल. त्यामुळे सरपंचासाठी रस्सीखेच होणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम राहिल. त्यामुळे गावागावातील राजकारण आतापसूनच तापले आहे.
चौकट
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करणे – 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
अर्जांची छाननी – 5 डिसेंबर
अर्ज माघारीची मुदत व चिन्ह वाटप – 7 डिसेंबर
मतदान – 18 डिसेंबर
मतमोजणी – 20 डिसेंबर