रहदारी पोलिसांच्या कारवाईने जनतेतून समाधान : कारवाईत सातत्य राहणे गरजेचे
बेळगाव : गणपत गल्ली येथील रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. याचबरोबर बैठ्या व्यापाऱ्यांनीही या परिसरात रस्त्यावरच ठाण मांडले होते. वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. मनपा हे अतिक्रमण हटविण्यामध्ये अपयशी ठरली. त्यामुळे रहदारी पोलिसांनी मंगळवारी रस्त्यावरील अतिक्रमण हटविले. यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र वारंवार अशा प्रकारे कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. गणपत गल्ली व बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाले आहेत. ते नेहमीच रस्त्यावरच ठाण मांडून असतात. त्यामुळे ये-जा करणे अवघड होत आहे. सणाच्यावेळी तर गणपत गल्ली व परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे.
अनेकवेळा त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र केवळ काही दिवसच हे व्यावसायिक हा नियम पाळतात. त्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या, या म्हणीप्रमाणे रस्त्यावरच व्यवसाय थाटत आहेत. मुख्य बाजारपेठ असल्याने शहरासह ग्रामीण भाग, परजिल्ह्यातून व राज्यातून खरेदीसाठी तसेच इतर कामांसाठी जनता मोठ्या प्रमाणात येत असते. त्यांना याचा त्रास होत आहे. रहदारी पोलिसांनी मंगळवारी केलेल्या कारवाईबद्दल स्वागत होत आहे. मात्र अधिक तीव्रतेने कारवाई होणे गरजेचे आहे. या कारवाईत सातत्य राहणेदेखील महत्त्वाचे आहे. काही दिवसांतच त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पुन्हा हे व्यावसायिक रस्त्याच्या मधोमध थांबत असतात, अशा तक्रारी जनतेतून होत आहेत. तेव्हा मनपाबरोबरच रहदारी पोलिसांनीही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.