23 नवी रुग्णालये अन् 62 दवाखाने सुरू होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कर्मचारी राज्य विमा निगमने (ईएसआयसी) स्वतःची आरोग्य विमा योजना (ईएसआय) 2022 च्या अखेरपर्यंत देशभरात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही योजना पूर्ण स्वरुपात 443 जिल्हे आणि आंशिक स्वरुपात 153 जिल्हय़ांमध्ये लागू आहे. एकूण 148 जिल्हे अद्याप ईएसआय योजनेच्या कक्षेत येत नाहीत.
श्रम तसेच रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या ईएसआयसीच्या 188 व्या बैठकीत देशभरात वैद्यकीय सुविधा आणि सेवा पुरवठा व्यवस्थेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत ईएसआय योजनेला चालू वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत ईएसआय योजनेच्या अंतर्गत आंशिक स्वरुपात मोडणारे आणि सध्या याच्या अंतर्गत न येणाऱया सर्व जिल्हय़ांना योजनेच्या कक्षेत आणले जाणार आहे.
आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या (पीएमजेएवाय) एमआयएमपी (संशोशित विमा चिकित्सा व्यावसायिक) आणि टाय-अप रुग्णालयांना यादीबद्ध करून नव्या डीसीबीओ (औषधालय सह शाखा कार्यालय) च्या स्थापनेच्या माध्यमातून वैद्यकीय देखभाल सेवा प्रदान केली जाणार आहे. याचबरोबर ईएसआयसीने देशभरात 23 नवी 100 बेड्सची सुविधा असलेली रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या ठिकाणी होणार स्थापन
यातील 6 रुग्णालये महाराष्ट्रातील पालघर, सातारा, पेण, जळगाव, चाकण आणि पनवेल येथे स्थापन केली जाणार आहे. तर हरियाणातील हिसार, सोनीपत, अंबाला आणि रोहतकमध्येही ही रुग्णालये निर्माण केली जातील. तामिळनाडूतील चेंगलपट्टू आणि इरोडमध्ये रुग्णालयांची स्थापना करण्यात येईल. उत्तरप्रदेशमध्ये दोन तर कर्नाटकातील तुमकूर आणि उडुपीत रुग्णालय सुरू केले जाणार आहे. आंध्रप्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्णालय स्थापन केले जाणार आहे. याचबरोबर 62 ठिकाणी डिस्पेंसरीज सुरू करण्यात येतील. यातील 48 डिस्पेंसरीज महाराष्ट्रातील असतील.
कर्मचाऱयांना मिळणार लाभ
या रुग्णालये आणि डिस्पेंसरीजमध्ये विमाप्राप्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सुविधा मिळू शकणार आहे. ईएसआयसीने बैठकीत विमाप्राप्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आयुष्मान भारतच्या पॅनेलमध्ये सामील रुग्णालयांच्या माध्यमातून कॅशलेस वैद्यकीय देखभाल सेवांचा लाभ घेण्याची अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. या टाय-अप व्यवस्थेच्या माध्यमातून 157 जिल्हय़ांमध्ये ईएसआय योजनेचे लाभार्थी पूर्वीच कॅशलेस वैद्यकीय देखभालीचा लाभ घेत असल्याचे सांगण्यात आले.
महत्त्वाची वैद्यकीय सुविधा
सनर्थनगर, फरीदाबाद आणि चेन्नईमध्ये ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि आण्विक चिकित्सा विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ईएसआयसीच्या रुग्णालयांमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. पुण्यातील 200 बेड्सच्या ईएसआयसी रुग्णालयाला 500 बेड्सच्या सुविधेत विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुण्यातील 7 लाख कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाभ होणार आहे.