ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आ. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा विधानसभेची तर आ. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून, भाजपने या जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, याचदरम्यान कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी राजकीय हलचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला आहे. त्यानंतर आता राज ठाकरेंनी या निवडणूका बिनविरोध होण्यासाठी मविआला साद घातली आहे.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी राज ठाकरेंनी सर्वपक्षांना पत्र लिहिलं आहे. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपने जो उमदेपणा दाखवला तो आता मविआने कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत दाखवावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, सस्नेह जय महाराष्ट्र,
महाराष्ट्र विधानसभेच्या 2 आमदारांचं नुकतंच दु:खद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणुका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.
अधिक वाचा : पुणे जिल्ह्यातील नऊ गुन्हेगार एकाच वेळी तडीपार
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दु:खद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.