पंतप्रधान मोदी करणार सेवेचा शुभारंभ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर देशात 5-जी सेवा सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील प्रगती मैदानावर 5-जी सेवेचा शुभारंभ करणार आहेत. येथे शनिवारपासून 4 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रम-2022 सुरू होत असून त्यात पंतप्रधान मोदी ही सेवा कार्यान्वित करतील. पंतप्रधान मोदी हाय-स्पीड मोबाईल इंटरनेट सुविधेच्या लॉन्चिंगदरम्यान दिल्लीच्या द्वारका सेक्टर 25 मधील आगामी मेट्रो स्टेशनच्या भूमिगत बोगद्यातून 5-जी सेवांच्या कार्याचे प्रात्यक्षिक देखील पाहतील.
2023 मध्ये देशातील 10 कोटीहून अधिक लोकांना 5-जी सेवा वापरायची आहे. या लोकांकडे स्मार्टफोनही असून ते 5-जी नेटवर्कच्या वापरासाठी तयार आहेत. यातील बहुतांश ग्राहक 5-जी सेवेसाठी 45 टक्क्मयांपर्यंत अधिक पैसे देण्यासही तयार आहेत. देशात डिजिटल परिवर्तन घडवण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेण्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. ‘5-जी’मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान 36.4 ट्रिलियन रुपये (सुमारे 455 अब्ज डॉलर) फायदा होण्याची शक्मयता आहे.
इंडिया मोबाईल काँग्रेस-2022
चार दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेस-2022 कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू होत आहे. दूरसंचार विभाग आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन (सीओएआय) संयुक्तपणे या सहाव्या आवृत्तीचे अनावरण करतील. कार्यक्रमात पुन्हा एकदा, नवीन तांत्रिक नवकल्पनांना आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यावर सविस्तर चर्चा होऊ शकते. या कार्यक्रमाची थीम ‘न्यू डिजिटल युनिव्हर्स’ अशी असून ती विकसित डिजिटल भारतासाठी स्टार्टअप्स आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्य करणार आहे. या महोत्सवाला 70 हजारांहून अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमात देशातील सर्वात मोठे तंत्रज्ञान प्रदर्शनही भरवले जाणार आहे.
मुंबई, पुणे, बेंगळूरसह पहिल्या टप्प्यात 13 शहरे
माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी 5-जी सेवा देशात वेगवेगळय़ा टप्प्यात सुरू केली जाईल असे स्पष्ट केले होते. सध्या पहिल्या टप्प्यात 13 शहरांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात अहमदाबाद, बेंगळूर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे या 13 शहरांमध्ये 5-जी नेटवर्क सुरू केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर छोटी शहरेही या सेवेशी जोडली जातील. त्यानंतर दोन वर्षांत 5-जी नेटवर्क देशभरात वेगाने विस्तारले जाईल. या सेवांच्या विस्तारासाठी दूरसंचार विभागाकडून शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.