एखाद्या माणसाच्या गाढ झोपेवर कोणत्याही आवाजाचा परिणाम होत नसेल तर आपण त्याला सहजपणे ‘कुंभकर्णी झोप’ असे म्हणतो. परंतु जेव्हा संत एकनाथ महाराजरचित भावार्थ रामायणामध्ये कुंभकर्णाच्या झोपेचे वर्णन येते तेव्हा आपण अवाक् होतो. ते अद्भुत वर्णन वाचून हसूही येते. ब्रह्मशापामुळे कुंभकर्ण सात ते दहा महिन्यांनी जागा होत असे. कुंभकर्णाची झोप घोर आणि गाढ होती. सहस्त्र हत्ती जेव्हा त्याच्या निद्रिस्त शरीरावरून चालत गेले तेव्हा एक विचित्र गोष्ट घडली. कुंभकर्णाच्या अंगावरील केसात हत्ती गडप झाले आणि त्यांना दिवस-रात्र यांची जाणच येईना. अनेक हत्ती कुंभकर्णाच्या बेंबीत पडून मेले. उंट, घोडे, रेडे नाकपुडीत तडफडून मेले. शेवटी उर्वशीने नारायण या आत्मशक्तीची स्तुती केली. तू आता कुंभकर्णाला जागे कर, नाही तर रावण राजकन्या, गंधर्वकन्या, अप्सरा यांची विटंबना करेल. तेव्हा प्रत्यक्ष परमात्म्याने कुंभकर्णाच्या प्राणांत चेतना निर्माण करून त्याला जागे केले.
रामायणामध्ये कुंभकर्ण निद्राधीन होता, तर लक्ष्मणाने निदेवर विजय मिळवला होता. तेलुगू रामायणात एक वेगळी कथा आहे. वनवास संपेपर्यंत निरंतर जागरण आणि उपवास करण्याची लक्ष्मणाने प्रतिज्ञा केली होती. एक दिवस निद्रादेवी लक्ष्मणासमोर येऊन म्हणाली, ‘निसर्गनियमानुसार तुम्ही माझ्या स्वाधीन व्हा.’ तेव्हा लक्ष्मणाने आपली प्रतिज्ञा तिला सांगितली. ती म्हणाली, तुम्हाला जर माझा स्वीकार करता येत नसेल तर अन्य कोणा व्यक्तीच्या देहाचा ताबा मला द्या. तिथे मी जाईन. यावर लक्ष्मण म्हणाले, वनवासाची 14 वर्षे संपेपर्यंत तू अयोध्या येथे माझी पत्नी उर्मिला हिच्या देहामध्ये वास करून रहा. मी तुला वचन देतो, की वनवास संपताच मी तुझ्या अधीन होईन. त्यानुसार उर्मिला चौदा वर्षे निद्राधीन होती. तेलुगु भाषेमध्ये ‘उर्मिला निद्रा’ नावाचे लोकगीत आहे. राम अयोध्येचा राजा झाला तेव्हा एकाएकी लक्ष्मण मोठमोठय़ाने हसू लागला. या हसण्यामुळे सारे विचारमग्न झाले. लक्ष्मण म्हणाला, आयुष्यामध्ये सुवर्णक्षण आला असताना निद्रादेवीला दिलेल्या वचनानुसार मला झोप येते आहे. या आनंदप्रसंगी मी निद्रा मागून घेतली याचे मला हसू येते आहे. रामायणामध्ये निद्रा याप्रसंगी भेटते.
श्रीकृष्ण चरित्र आणि महाभारत यामध्ये निद्रादेवीचे अस्तित्व ठळकपणे आढळते. जिथे गती कुंठित होते त्या वैकुंठात राहणाऱया परमात्म्याचा जन्म कंसाच्या बंदीखान्यातच झाला. श्री भगवान विष्णू वसुदेव-देवकीसमोर स्वतःच्या मूळ रूपात प्रकट झाले. भगवंत जेव्हा अवतरले तेव्हा अज्ञानाचा लोप झाला आणि कंसाच्या पहारेकऱयांना योगनिद्रा लागली. मध्यरात्रीची वेळ, पाऊस आणि सारी सृष्टी निद्रिस्त असताना वसुदेवाच्या डोक्मयावरील डोलीतून निर्मनुष्य रस्त्यांवरून श्रीकृष्ण सहजपणे गोकुळात पोहचले. यशोदेच्या गर्भात साक्षात योगमाया होती. परमात्मा आणि योगमाया हे दोघेही अयोनी संभव आणि अजन्मा असल्यामुळे ते आपल्या शक्तीनेच प्रगट झाले. त्यामुळे योगमायेच्या जन्माच्यावेळी यशोदा गाढ निदेत होती. सर्व गोकुळही निद्रिस्त होते. यशोदा जागी झाली आणि बाल रूपात तिला प्रत्यक्ष परमात्म्याचे दर्शन झाले. ते दिव्य सौंदर्य पाहून ती निर्विचार झाली आणि आपल्याला गाढ झोप कशी लागली? आपले बाळंतपण कोणी केले? हे तिच्या मनात आलेच नाही. निद्रा हे दुर्गा मातेचे एक रूप आहे. दुर्गासप्तशतीमध्ये म्हटले आहे–
‘या देवि सर्वभुतेषू निद्रारुपेण संस्थितः
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः’
निद्राधीन विष्णूभगवंताला जागे करण्यासाठी ब्रह्मदेव निद्रादेवीचे स्तवन करून तिला विष्णूंना जागे करण्याची विनंती करतात. परमात्मा जागृत झाला की माया आपला खेळ आवरता घेते. सृष्टी मायेच्या अधीन असल्यामुळे माणूस सुखदुःखाचा प्रपंच खेळासारखा मानत नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या ‘हाचि सुबोध गुरूंचा’ या पदामध्ये म्हटले आहे की, ‘आचार संयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा। हाचि सुबोध गुरूंचा, खेळा ऐसा प्रपंच मानावा।’ अज्ञानाची गाढ झोप लागल्यामुळे माणसाला हे समजत नाही.
कौरव-पांडव युद्ध निश्चित झाल्यानंतर कृष्णाकडे मदत मागण्यासाठी दुर्योधन आणि अर्जुन दोघेही गेले. दुर्योधन अर्जुनाआधी द्वारकेला पोहचला, त्यामुळे त्याला पहिल्यांदा कृष्णाला मदत मागण्याचा हक्क प्राप्त झाला. हे दोघे पोहचले तेव्हा कृष्ण झोपला होता. दोघांनी कृष्णाच्या महालात प्रवेश केला आणि कृष्ण ज्या पलंगावर झोपला होता त्या पलंगाच्या डोक्मयाकडच्या बाजूला ठेवलेल्या सुंदर आसनावर दुर्योधन गर्वाने जाऊन बसला. अर्जुन डोळे मिटून भक्तिभावाने कृष्णांच्या पायांकडे उभा राहिला. कृष्ण झोपेतून जागा झाला, त्याला अर्जुन दिसला. तो अर्जुनाकडे पाहून हसला. दुर्योधन जरी त्याच्याकडे प्रथम आला तरी झोपेतून जागा झाल्यावर पहिली दृष्टी अर्जुनावर पडली म्हणून त्याने दोघांनाही मदत करायची असे ठरवले आणि प्राधान्य अर्जुनाला दिले. त्यामुळे पार्थसारथी हे नाव अमर झाले. श्रीकृष्णाची ही झोप अर्जुनाच्या पथ्यावर पडली. द्रोणाचार्यांच्या वधाचे आणि द्वंद्वयुद्धाचे नीतिनियम डावलून गदायुद्धात भीमाने दुर्योधनाला मारले याचे असह्य दुःख घेऊन अश्वत्थामा निदेविना तडफडत होता तेव्हा त्याने निसर्गाचा एक अद्भुत खेळ बघितला. एका वृक्षावर कावळय़ांनी घरटी केली होती. ते कावळे शांतपणे झोपले होते. तितक्मयात तिथे अचानक एक घुबड आले आणि त्याने सगळय़ा कावळय़ांना टोचीने मारून ठार केले. घुबड मजेत होते. सारे कावळे मारून ते निघून गेले. या दृश्याने अश्वत्थाम्याच्या मनात एक कल्पना रुजली आणि त्याने ती प्रत्यक्षात आणली. युद्धसमाप्तीच्या आनंदात पांडवांच्या शिबिरात सारे शांत झोपले होते. घुबडाने जे केले त्याप्रमाणेच तो पांडवांच्या तंबूत शिरला आणि अतिशय क्रूरपणे त्याने दृष्टद्युम्न आणि द्रौपदीच्या सगळय़ा मुलांना ठार केले. अनेक वीरांना त्याने झोपेतच मारून टाकले. ही गोष्ट मरणाच्या दारात उभ्या असलेल्या दुर्योधनाला कळली तेव्हा तो आनंदित झाला आणि तो काळनिदेच्या कुशीमध्ये लुप्त झाला. झोपेतला हा संहार अश्वत्थाम्याच्या चिरंजीव दुःखाला कारण ठरला. रानीवनी निर्जनी हिंडणाऱया अश्वत्थाम्याला या निदेतल्या संहाराचे खरेच का दुःख होत असेल? त्याची झोप तर कायमची निघून गेली असेल.
चातुर्मासात विठोबा झोपी जातो आणि कर्मयोगाचे शिक्षण भक्तांना देतो. कर्म तसे फळ हा धडा देण्यासाठी तो भक्तांपासून अलिप्त होऊन झोपतो. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ ही माणसाची भावना असू नये म्हणून तो झोपतो. आयुष्यात बरेचदा माणूस दोन अर्थाने देव काय झोपला आहे का? असे म्हणतो. सत्ता-पैसा-प्रति÷sच्या जोरावर एखादा मनुष्य उन्मत्तपणे समाजाला वेठीला धरतो तेव्हा हे वाक्मय ओठांवर येते आणि जेव्हा त्याची प्रार्थना, कळकळ, स्मरण, धावा हे काहीही देव कानावर घेत नाही तेव्हाही त्याला हाच प्रश्न पडतो. झोप ही परमेश्वराची कृपा आहे. म्हणून झोपताना सृष्टीमधल्या प्रकृतीपरमात्म्याला वंदन करून निजावे हा आपला संस्कार आहे.
– स्नेहा शिनखेडे