► प्रतिनिधी/ बेळगाव
समाजाला श्रद्धास्थाने असतात, विचारवंत मात्र एकाकी असतो. लिहिणाऱ्याची जात कोणती, हा निकष मानला तर चिकित्सेला भवितव्य उरणारच नाही. चिकित्सा करण्याची वेळ आली की समाज मागे सरकतो. परंतु विचारवंतांनी तरी तसे करू नये. आपण नास्तिक असलो तरी आस्तिकांच्या भावना दुखावण्याचे कारण नाही, असे अर्थपूर्ण भाष्य करणाऱ्या नरहर कुरुंदकर यांचे लेखन काळाच्या कसोटीवर आजही खरे उतरते आहे.
त्यांच्याच लेखनावर ‘नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हा साभिनय अभिवाचनाचा प्रयोग लोकमान्य रंगमंदिर येथे झाला. या कार्यक्रमातून अनेकांना नव्याने कुरुंदकरांचे आकलन झाले, असे म्हणण्यास हरकत नाही. याचे लेखन आणि संकल्पना अजय अंबेकर यांची असून सूत्रधार व निर्माती ज्योती अंबेकर आहेत. साहाय्यक दिग्दर्शक राजू किवळेकर आहेत. ज्योती यांनी शिक्षिकेची तर अजय अंबेकर यांनी वेगवेगळ्या सहा भूमिका साकारल्या आहेत. आई आणि प्रभावती ही भूमिका ज्योती पाध्ये यांनी तर छोट्या नरहरची भूमिका शुभंकर देशपांडे तर शास्त्राr, जेलर, रामलाल, कहाळेकर यांच्या भूमिका राजीव किवळेकर यांनी साकारल्या. नरहर कुरुंदकरांच्या मुख्य भूमिकेत होते दिलीप पाध्ये.
शिक्षिकेच्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर कुरुंदकरांची व्याख्यानातील वेचे, त्यांचे मनोगत, त्यांची चिकित्सा आपल्यासमोर उलगडत जाते. ताकदीच्या अहंतेमुळे बलवंतांचा दबाव वाढला तरी अन्याय करणाऱ्या धटिंगणांसमोर पड घेण्याऐवजी प्रतिकाराची रित शोधून काढली पाहिजे, यासह अनेक विचारांचे खाद्य हा प्रयोग आपल्याला देतो. मात्र, दोन तासांत कुरुंदकर समजणे केवळ अशक्य आहे. तथापि, त्यांच्या साहित्याचे वाचन करायला हवे, हा विचार मात्र इथे पक्का होतो. सर्वांनी आपापली कामे चोख बजावली, यात वाद नाही. मात्र तर्कशुद्ध, ठाम आणि विचारी कुरुंदकर यांचे पात्र पाध्ये यांनी नेमकेपणाने साकारले. हा सर्व प्रयोग खरे तर अनुभवण्याचा. प्रयोगाच्या शेवटी मध्यभागी उभे असलेले कुरुंदकर आणि सोबत ‘उड जायेगा हंस अकेला’ या गीताच्या ओळी अतिशय मार्मिक ठरतात आणि विचारवंत एकाकी असतो. परंतु तो हंस असतो, हेच जणू अधोरेखित होते. मोजके नेपथ्य ही आणखी एक लक्षणीय बाजू. पडद्यावर प्रसंगानुरुप समोर येणारी रेखाचित्रे विलक्षण, कल्पक अशीच होती. या प्रयोगाला प्रशांत ठाकरे, शुभम हुलसुरे, मयूर सरकाळे व दिव्या कुलकर्णी यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. हा प्रयोग काहीसा संथगतीने व सततच्या निवेदनाने पुढे सरकतो. त्याऐवजी त्यामध्ये अधिक नाट्यामयता आल्यास तो अधिक प्रत्ययकारी ठरेल.