युवा काँग्रेसची मागणी : गोमेकॉतील गांजा प्रकरण
प्रतिनिधी /पणजी
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात गांजा सापडल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी तडकाफडकी निर्णय घेत पाच विद्यार्थ्यांच्या हकालपट्टीचा दिलेला आदेश त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसने केली आहे. पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांची हकालपट्टी करू नये, असे आवाहन अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर यांनी केले आहे.
इंटर्नच्या पाच विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्याच्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या आदेशासंबंधी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी अर्चित नाईक, नौशाद चौधरी, विवेक डिसिल्वा, क्लिबान फर्नांडिस, टेरेन्स पिकार्डो आणि इतरांची उपस्थिती होती.
सदर गांजा वसतीगृहाच्या खोलीत सापडला होता. त्या प्रकरणी आगशी पोलीस चौकशी करत असून अज्ञाताविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अशावेळी चौकशी सुरू असताना आरोग्यमंत्री पाच विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय कसा घेऊ शकतात? असा सवाल नौशाद यांनी केला.
पूर्वी अमलीपदार्थ सेवन हे रेव्ह पाटर्य़ा आणि किनारी भागापुरते मर्यादित होते. सध्या राज्यात खेडोपाडी अमली पदार्थ पोहोचले आहेत. एवढेच नव्हे तर अनेक शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांमध्ये सुद्धा ते मुक्तपणे उपलब्ध होत आहेत. तरीही पोलीस आणि इतर विभाग डोळेझाक करत आहेत, असे म्हार्दोळकर पुढे म्हणाले.
या प्रकाराला गृहमंत्रिपद भूषविणारे मुख्यमंत्री जबाबदार आहेत. कारण पोलिसांची भीती नसल्यामुळेच अमलीपदार्थ फोफावत आहेत. किंबहुना पोलिसांच्या आशीर्वादानेच अमलीपदार्थ मुक्तपणे उपलब्धही होत आहेत. त्यावरूनच आपण मुख्यमंत्री आणि पोलिसांना जबाबदार धरत आहे, असे म्हार्दोळकर पुढे म्हणाले.
असे आरोप होणे नको असेल तर सरकारने या अमलीपदार्थ तस्करांवर कठोर कारवाई करावी. 2018 मध्ये खुद्द भाजपचे पदाधिकारी वासुदेव परब यांच्या मालकीच्या पिसुर्ले येथील कारखान्यात 100 किलो ’केटामाइन’ हा अमलीपदार्थ जप्त करण्यात आला होता, याची आठवण म्हार्दोळकर यांनी करून दिली.
सरकारने आतातरी हा विषय गांभीर्याने घ्यावा. संबंधितांवर कारवाई करावी. अन्यथा गोव्यातील तरुणाई संपुष्टात येईल. आरोप सिद्ध न झालेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करून लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचे प्रकार मुख्यमंत्र्यांनी थांबवावे. अमलीपदार्थ व्यवहाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलावी व तसे आदेशे पोलिसांना द्यावे, असे म्हार्दोळकर म्हणाले.
दरम्यान, गोमेकॉ सारख्या संस्थेत अमलीपदार्थ पोहोचणे हे प्रशासनाचे पूर्ण अपयश असल्याचे मत अर्चित नाईक यांनी व्यक्त केले आहे. गोवा हे देशातील सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ असल्यामुळे लोक वारंवार येत असले तरी अमलीपदार्थ, गुन्हे, वेश्याव्यवसाय यांचा अतिरेक झाल्यास गोवा हे असुरक्षित स्थळ बनणार आहे. त्यातून लोक येणे बंद होईल व परिणामी पर्यटनावर अवलंबून असलेले राज्य संकटात सापडेल, अशी भीती श्री. नाईक यांनी व्यक्त केली आहे.