प्रेमानंद शिरोडकर /माशेल
आषाढी एकादशीनिमित्त साजरा होणारा माशेल गावातील प्रसिद्ध चिखलकाला सोमवार 11 रोजी साजरा होणार आहे. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे त्यात खंड पडला होता. माशेल गावात तसे वर्षभर अनेक उत्सव साजरे होतात. मात्र येथील प्रमुख मंदिर असलेल्या श्री देवकीकृष्ण मंदिरतर्फे स्थानिकांच्या माध्यमातून साजऱया होणाऱया दोन प्रमुख उत्सवापैकी चिखलकाला हा प्रमुख उत्सव. त्यामुळे भाविकांना या उत्सवाबद्दल विशेष आकर्षण वाटते.
चिखलकाल्याला खूप जुनी परंपरा असून तो नेमका कधी सुरु झाला याची लिखित माहिती उपलब्ध नाही. या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरुप असून लोकगीते पारंपारिक खेळ, नाच गाणी अशा विविध प्रकारांचा त्यात समावेश आहे. श्रीकृष्णाच्या बालक्रीडांशी निगडीत असा हा उत्सव असून आजही त्याचे स्वरुप बदललेले नाही. पूर्वी देऊळवाडा भागातील मर्यादित लोक चिखलकाल्यात सहभागी व्हायचे. आता आसपासच्या गावातील लोकही त्यात सहभागी होऊ लागल्याने या उत्सवाला व्यापक स्वरुप आले आहे. पूर्वी चिखलकाल्याचे नेतृत्व कै. लक्ष्मण भगत, कै. विश्राम सावळ व अन्य ज्येष्ठ मंडळी करीत. सध्या किशोर भगत हे नेतृत्व करतात.
उत्सवाच्या दिवशी सकाळी 11.30 वा. सुमारास देऊळवाडय़ावरील मंडळी देवकीकृष्ण मंदिरात जमल्यानंतर श्रींस गाऱहाणे घातले जाते. पारंपारिक समई प्रज्वलीत करून चोवीस तासांच्या अखंड भजनी सप्ताहाला सुरुवात होते. वाडय़ावरील कलाकार तीन तीन तास याप्रमाणे भजने सादर करतात. गेल्या काही वर्षापासून महाशाला कला संगमचे कलाकार सप्ताहात भजने सादर करीत आहेत. चिखलकाल्याच्या दिवशी सकाळी गावातील तरुण व लहान मुले देवकीकृष्ण मैदानावर पाणी अडविण्याची व्यवस्था करतात. त्यानंतर बाजारात जाऊन दुकानदारांकडून तेल मागून ते अंगाला लावले जाते. दुसऱया बाजूने चिखलकाल्याचा प्रमुख ‘गोपाळ गडी यारे’ असे लोकगीत गात सर्वांना साद घालतो. सर्व मंडळी हरिनामाचा जयघोष करीत दाडशंकर मंदिराकडे जाऊन तेथे देवदर्शन घेतल्यानंतर प्रत्येकाच्या कपाळाला नाम लावला जातो. तेथून ‘जय विठ्ठल हरि विठ्ठलच्या’ नामघोषात श्रीदेवकीकृष्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिरात प्रवेश करतात. पारंपारिक समई भोवती ‘जय विठ्ठल हरि विठ्ठल’ असा गजर करीत फेर धरतात. पुजाऱयाकडून भाविकांवर तीर्थ शिंपडले जाते व समईतील तेल अंगाला लावून सर्व मंडळी चिखलकाल्यासाठी सज्ज होते.
येथील पिंपळाच्या कट्टय़ावर गव्हांचे पीठ व नारळापासून तयार केलेला बोल हा खाद्य पदार्थ व इतर खाऊ भाविकांच्या गर्दीमध्ये फेकला जातो. ते मिळविण्यासाठी सर्वांमध्ये चढाओढ लागते. यावेळी गेल्या वर्षीचे नवस फेडण्याची व नवीन नवस करण्याची प्रथा आहे. त्यानंतर भर पावसात चिखलकाल्याला सुरुवात होते. तत विविध प्रकारचे पारंपारिक खेळ खेळले जातात. बेडुकउडय़ा, चेंडू फेकणे, आंधळी काशिंबीर, चक्र, मेंढऱया पळविणे अशा खेळांचा त्यात समावेश असतो. दोन गटामध्ये शक्ती प्रदर्शनही होते. त्यातील मजेशीर प्रकार म्हणजे नवरा-नवरी हा खेळ. त्यात दोन गटामध्ये गाणी व नाच होतो. पूर्वी कै. विश्राम सावळ कोणतेही वाद्य न घेता अचूक सनई वाजवायचे व सर्व ताल धरून नाचायचे. हल्ली आधुनिक पद्धतीची गीते वाजवून हा खेळ खेळला जातो. हे खेळ खेळताना परस्पराच्या अंगावर चिखल फेकणे तसेच वाद संवादही चालतो. शेवटी नवरानवरील एकत्र आणून वरमाला घातल्यानंतर दही हंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. चिखलकाल्याचा समारोप होऊन गावातील तळीवर सर्व भाविक आंघोळीला जातात. देवकीकृष्ण मंदिरात आरत्या, तीर्थप्रसाद व गाऱहाणी घालून चोवीस तासांच्या अखंड भजनी सप्ताहाची सांगता केली जाते.