गर्लगुंजी शिवारातील प्रकार : रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा विरोध
बेळगाव : गर्लगुंजी येथील शिवारात रेल्वे मार्गासाठी सर्व्हे करणाऱ्यांवर शेतकऱ्यांनी जोरदार आक्षेप नोंदविला. शेतात परवानगीशिवाय पाय ठेवाल तर याद राखा असा सज्जड इशारा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सर्व्हे बंद करत तेथून काढता पाय घेतला. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी सुपिक जमीन घेतली जात असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला. बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वे मार्गासाठी दोनच दिवसांपूर्वी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. हा रेल्वे मार्ग देसूर ते केके कोप्पपर्यंत सुपिक जमिनीतून जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा याला विरोध आहे. शेतकऱ्यांनी केआयडीबी धारवाड तसेच नैर्त्रुत्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांकडे आक्षेपही नोंदविला आहे. त्याचबरोबर धारवाड उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. असे असतानाही आरएसपीएस सीप्रा प्रा. लि. कंपनीचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी रविवारी गर्लगुंजी शिवारात दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी सर्व्हेला विरोध केला. ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील यांनी कर्मचाऱ्यांना इशारा देताच सर्व्हे थांबविण्यात आला. यावेळी पीकेपीएस नंदीहळ्ळीचे संचालक राजेंद्र पाटील, डॉ. किरण लोंढे, यशवंत पाटील, नामदेव कुंभार, अरूण सावंत, प्रकाश सिद्दानी, संजय सिद्दानी, कल्लाप्पा लोहार, संगाप्पा कुंभार, सदानंद पाटील, नामदेव कुंभार मारुती राऊत, परशराम जाधव यासह इतर उपस्थित होते.