चार मालिकांचे चित्रीकरण सुरु : जवळपास 500 स्थानिक कलाकार, तंत्रज्ञांना रोजगार
कोल्हापूर /अहिल्या परकाळे
येथील चित्रनगरीत चार मराठी मालिकांचे चित्रीकरण सुरु आहे. यामध्ये रोज स्थानिक कलाकारांना रोजगाराची संधी मिळत आहे. चित्रीकरणाचा कोरम फुल्ल झाल्याने जवळपास 500 कलाकारांना सुगीचे दिवस आले आहेत. पावसाळा सुरु असल्याने आऊट डोअर शुटींग स्पॉटवरील निसर्ग सौंदर्य खुलले आहे. पुन्हा एकदा चित्रपट इंडस्ट्री कोल्हापुरात रुजतेय, त्याला राजकीय पाठबळाची गरज आहे.
कोल्हापुरात ‘सुंदरी’, ‘जीव माझा गुंतला’, ‘आभाळाची माया’ आणि ‘शेगावचे गजानन महाराज’ या मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. त्यासाठी ज्युनिअर आर्टीस्ट, टेक्निशियन, स्पॉटबाय, कॅमेरामन आदीसाठी स्थानिकांना प्राधान्य दिले जात आहे. त्यातून बऱ्याच वर्षांनी कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही कलाकार तर सर्वच मालिकांमध्ये वेगवेगळय़ा भुमिकांमध्ये दिसत आहेत. कोल्हापुरात कमी खर्चात पूरक लोकेशन मिळत असल्याने निर्मार्त्यांचा ओढा वाढत आहे. पावसाळय़ानंतर मालिका, दोन चित्रपट आणि एक वेबसिरीजचे चित्रीकरण येथे होणार आहे. त्यासंदर्भात चित्रनगरी प्रशासन आणि निर्मात्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
चित्रनगरी, तामगाव, पाचगाव परिसरात डेली सोप मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. यातून चित्रपट इंडस्ट्री पुन्हा एकदा मूळ धरु पाहतेय, ती वाढवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. अडीच वर्षात माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी चित्रनगरीच्या विकासाला प्राधान्य दिले होते. परिणामी चित्रिकरणासाठी अनेक दिग्दर्शकांनी कोल्हापूरला पसंती दिली आहे. हिंदीतील मोठय़ा मालिका व चित्रपट येण्यासाठी चित्रनगरीत आणखी दोन मोठय़ा फ्लोअरची गरज आहे. तरी राज्य सरकारने याबाबत निर्णय घेऊन चित्रनगरीला गतवैभव देण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा कलाकारांची आहे.
कोल्हापूरला कलेचा वारसा आहे. नाटक, नृत्य, अभिनय, नेपथ्य, केशभूषा, वेशभूषा आदींचे धडे बालपणापासूनच येथे दिले जातात. यातूनच कलाकार, लेखक, दिग्दर्शक तयार होतात. कोल्हापुरात चित्रपट, मालिका आणण्याचा सरकारने प्रयत्न केला तर स्थानिक कलाकारांच्या पोटाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
कोल्हापुरातील चित्रपट इंडस्ट्रीला प्राधान्य द्यावे
कोल्हापुरात चित्रपट इंडस्ट्री पुन्हा मूळ धरत आहे. तरी सरकारने चित्रनगरीला जास्तीत जास्त निधी देऊन विकासाला प्राधान्य द्यावे. चित्रपट सृष्टीचे प्रयत्न आणि सरकारचे आर्थिक बळ कोल्हापूरला गतवैभव मिळवून देईल.