मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा : आपदा सखी, मित्रांना प्रमाणपत्रे प्रदान
प्रतिनिधी /पणजी
राज्य अग्निशामक दलात यापुढे स्वतःचे पाणबुडे नियुक्त करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. अग्निशमन सेवा दल आणि गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आपदा मित्र व आपदा सखी यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संयुक्त सचिव कुणाल सत्यार्थी, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे, राज्याचे महसूल सचिव संदीप जाकीस, अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर, विभागीय अधिकारी राजेंद्र हळदणकर, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. केंद्र सरकारच्या आपदा मित्र व सखी योजनेखाली अग्निशमन दलाने प्रशिक्षण दिलेल्या 21 मित्र आणि 16 सखींना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी अग्निशामक दल तत्पर असून आतापर्यंत आग आणि नैसर्गिक दुर्घटनांशीच दोन हात करणारे दल यापुढे बुडणाऱया व्यक्तींनाही वाचविण्यासाठी सक्षम बनविण्यात येणार आहे, असे सांगितले..
गृहरक्षकांच्या धर्तीवर नियुक्ती
एखादी व्यक्ती खोल समुद्रात बुडाल्यास त्याला वाचविण्यासाठी किंवा शोध घेण्यासाठी सध्या नौदल वा तटरक्षक दलाची मदत घेण्यात येते. यापुढे ही सेवा अग्निशामक दलाच्या अंतर्गत आणण्यात येणार आहे. त्याकामी नियुक्ती करताना आपदा सखी व मित्र यांना प्राधान्य देण्यात येईल. सध्यस्थितीत या सखी व मित्रांना आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वयंसेवक म्हणून कार्यरत करण्यात येणार आहे. गृहरक्षकांच्या धर्तीवर ही सेवा असून त्यासाठी त्यांना सरकारतर्फे किमान मानधन, भत्ता देण्यात येईल. तसेच भविष्यात अग्निशामक दलात थेट नियुक्तीसाठी पदे रिक्त होतील तेव्हा त्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आपदा मित्र, सखीचे योगदान महत्वपूर्ण ठरणार
सतत होणाऱया हवामान बदलामुळे हल्लीच्या वर्षात बारामाही कधीही पाऊस, वादळ, पूर, भूकंप, ढगफुटी, आग, यासारख्या विविध नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींचा आम्हाला सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सदैव सज्ज असावी लागते. या कामी दलाच्या जवानांना मदत करण्यासाठी आपदा सखी व मित्रांचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. आपत्कालीन प्रसंगी परिस्थिती कशी हाताळावी व लोकांना त्यात कसे सहभागी करून घ्यावे, हे या सखी व मित्रांचे प्रमुख काम आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःला सदैव अपडेट ठेवावे. या कामाशी संबंधित अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तेथे प्रशिक्षण घ्यावे. जेव्हा संधी असेल तेव्हा दलातर्फे त्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले.
श्री. रायकर यांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपदा मित्र आणि सखींना अभ्यास साहित्य प्रदान करण्यात आले. अजित कामत यांनी सुत्रसंचालन केले.