पिळर्णतील लोकांना आरोग्याच्या दृष्टीने करावा लागणार सामना, तज्ञांचे मत
प्रतिनिधी /पणजी
कोणताही अपघात हा अनवधनाने होत असतो हे जरी खरे असले तरी औद्योगिक जीवनपद्धती जगताना नीती-नियम पाळायला हवेत, हेही तेवढेच खरे आहे. याकडे कटाक्षाने लक्ष दिल्यास पिळर्णसारखी आगीची घटना टळली जाऊ शकते. पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील बर्जर बेकर कोटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला लागलेली आग सद्यःस्थितीत विझली असली तरी याबाबत चिंता कायम आहे. कारण या घटनेची तीव्रता पाहता पिळर्णतील लोकांना भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने सामना करावा लागण्याची शक्यता आहे, असे तज्ञांनी ‘तरुण भारत’शी बोलताना मत व्यक्त केले आहे.
मंगळवारी पिळर्ण येथे रंगनिर्मिती करणाऱया कारखान्याला मंगळवारी लागलेली आगीची झळ बुधवारी दुपारनंतर कमी प्रमाणात झाली. यासाठी अग्निशामक दलाने पत्करलेली जोखीम आणि केलेली कौतुकास्पद कामगिरी यामुळेच मोठा अनर्थ टळला आहे. 24 तासांहून अधिक आग धुमसत राहिल्याने कार्बन मोनोक्लॉईड हवेत मोठय़ा प्रमाणात पसरला आहे. हा कार्बन मोनोक्लॉईड कुणा-कुणाच्या शरीरात गेला आहे, हे आत्ताच सांगणे कठीण बनल्याचे आरोग्य अधिकाऱयांनी सांगितले.
हवेद्वारे धुराचे लोट वातावरणात पसरून ते उंचावरून गेले असले तरी सध्या थंडीचे दिवस असल्याने धुक्यामुळे ते साचून राहून ते जमिनीवर पुन्हा आल्याची rशक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात डोळ्यांचे त्रास व फफ्फुसांचे विकार होण्याची भीतीही वर्तवली आहे. आग लागल्यानंतर हवेत ढग निर्माण होऊन विषारी वायू हवेत पसरला आहे. हा विषारी वायू पिळर्ण परिसराबरोबर तिसवाडी भाग ते त्याबाजूकडील वाळपई, साखळी आदी भागापर्यंत आकाशात पसरल्याचेही जाणकारांचे मत आहे. रंगनिर्मिती करणाऱया कारखान्याला लागलेल्या आगीत प्लास्टिकही मोठय़ा प्रमाणात जळाले असून, याचा परिणाम दीर्घ काळापर्यंत जाणवण्याची शक्यता आहे. पिळर्ण येथील स्थलांतरीत केलेल्या लोकांना खासकरून काळजी घ्यावी लागणार आहे. जोपर्यंत कारखान्यातील सर्व विषारी घटक दूर होणार नाहीत, तोपर्यंत लोकांना अधिकच काळजी घ्यावी लागणार आहे.
विशेष काळजी घ्यावी
पिळर्ण येथील कारखान्याला लागलेली आग ही सध्या अटोक्यात आली असली तरी लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण कार्बन मोनोक्लॉईडचा परिणाम हा काही प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे रक्त वाहिन्यांवर परिणाम होण्याबरोबरच अचानक चक्कर किंवा अन्य त्रास जाणवण्याची शक्यता आहे. लोकांना श्वास घेताना अडचणीचे ठरू शकते. लहान मुलांना जर थंडी असेल तर विशेष काळजी घ्यावी लागेल. आगीची घटनेमुळे न घाबरता विशेष काळजी घेतल्यास त्याचा परिणाम शून्यही असू शकतो.
– डॉ. शेखर साळकर
लोकांच्या मनात विशेष भीती नाही
औद्योगिक सुरक्षेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास औद्योगिक जीवन पद्धती ही लोकांनी स्वीकारलेलीच आहे. आगीची घटना ही अचानक घडलेली घटना आहे. जरी धोका असला तरी भीती बाळगता कामा नये. कारण औद्योगिक सुरक्षेच्याबाबतीत काही नियम आहेत आणि ते पाळलेही जातात. औद्योगिक क्षेत्रात राहणाऱया लोकांचा नेहमीच विविध कंपन्यांच्या वातावरणाशी संपर्क येत असतो. त्यामुळे लोकांच्या मनात विशेष भीती राहणार नाही. तरीही औद्योगिक जीवन पद्धतीत नीती-नियमांकडे संबंधितांनी लक्ष द्यायला हवे.
– डॉ. मधुसूदन जोशी, फार्मसी महाविद्यालयाचे आरोग्य अधिकारी.
पिळर्ण येथे रंगनिर्मिती करणाऱया कारखान्याला मंगळवारी लागलेल्या घटनेवर औद्योगिक वसाहतीचे चेरअमन या नात्याने मी बारीक लक्ष ठेवून आहे. आज (बुधवारी) सकाळी सात वाजता व पुन्हा दुपारी दोन वाजता मी घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी केली आहे. आतो कोणताही धोका नसून, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. सरकारकडूनही योग्य ती दखल घेतली असल्याने आगीचे संकट संपले आहे. अग्निशामक दलाने व पोलिसांनी विशेष कार्य राबवल्याने त्यांचेही आपण कौतुक करतो.
– आरोक्स रेजिनाल्ड, चेअरमन – औद्योगिक वसाहत
पिळर्ण येथे कारखान्याला लागलेल्या आगीच्या घटनेवर आता पूर्णपणे नियंत्रण राखण्यात आम्हाला यश आले आहे. या कामी लष्कराचे जवान, नौसेना, गोवा एमपीटी व युनिकॉन औद्योगिक कंपनीचीही मोठी मदत लाभली. पिळर्ण येथे आता परिस्थिती सुस्थितीत आहे. तरीही अग्निशमन दलातर्फे योग्य ती खबरदारी अजूनही घेण्याचे काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळवताना सुमारे 12 लाख लीटर पाणी वापरावे लागले आहे. 24 तासांहून अधिक काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी परीश्रम घेतल्याने आपण त्यांचे व इतर अधिकाऱयांचेही कौतुक करतो.
– नितीन रायकर, संचालक – गोवा अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय
हवा अन् जलप्रदूषण रोखण्यास सरकार सक्षम : मुख्यमंत्री
पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील बर्जर बेकर कोटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला आग लागल्यानंतर आजूबाजूच्या भांगावर दूषित वायू आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी सातत्याने सरकारकडून लक्ष ठेवले जात आहे. गरज पडल्यास पुढील सूचना दिल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आजूबाजूच्या गावांमध्ये चोवीस तास वायू प्रदूषणाची पातळी मोजत आहेत, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. आग लागण्याची आणि ती वाढण्यामागचे कारणे शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती नेमण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. या चौकशी समितीमार्फत आगीच्या घटनेच्या मुळाशी जाण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकारने काल रात्री कारखान्याच्या 2 किमी परिघात राहणाऱया लोकांना अन्यत्र राहण्याचा सल्ला दिला होता. सुमारे 200 लोकांना या परिसरातून हलवण्यात आले. आग मोठी असली तरी या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.