दापोली / प्रतिनिधी
गावा-गावांत होणाऱ्या ग्रामसभा बहुतेकांना माहित आहेत.परंतु 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे कुडावळे येथे अनोख्या कृषी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही राज्यातील पहिलीच कृषी ग्रामसभा ठरणार आहे.
शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचाव्या व जनतेचे प्रश्नही कळावे यासाठी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येते. वेगवेगळ्या दिनाचे औचित्य साधून या अशा ग्रामसभा भरवण्यात येतात. या ग्रामसभांमध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्यामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यावर ग्रामस्थही आपले मत मांडत असतात. आपला देश कृषीप्रधान असूनही आजपर्यंत कधीही कृषी ग्रामसभा पार पडलेली नाही. मात्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शुक्रवारी राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून दापोली तालुक्यातील कुडावळे येथे पहिल्या कृषी ग्रामसभेचे आयोजन केले आहे.
या ग्रामसभेला परिसरातील शेतकरी उपस्थित राहणार असून त्यांना शेतीविषयी शासनाच्या विविध योजना सांगितल्या जाणार आहेत. त्या कशा राबवाव्या, अर्ज कसा करावा, निकष आदी माहितीदेखील देण्यात येणार आहे. या कृषी ग्रामसभेत केवळ शेतीशी संबंधित योजनाच सादर करण्यात येणार असल्यामुळे त्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अशा कृषी ग्रामसभा गावोगाव आयोजित झाल्यास कृषी क्षेत्रात ही एक वेगळी क्रांती घडेल असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
ही अनोखी कृषी ग्रामसभा पार पडल्यावर दरवर्षी वेगवेगळ्या गावांमध्ये अशा कृषी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातून शासनाच्या विविध शेतीपूरक योजना थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. यानिमित्त कुडावळे येथे कंद पिकांचे प्रदर्शनदेखील आयोजित करण्यात आले आहे. याला दापोली तालुक्यातील वाकवली येथील अखिल भारतीय समन्वयी कंदपिके सुधार योजनेचे शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त यापूर्वी 2020 मध्ये विद्यापीठाने बेगमी हा कार्यक्रम केला होता. निसर्ग चक्रीवादळानंतर विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या मुर्डी गावामध्ये राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त प्रात्यक्षिके व प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. कोकणामध्ये अमावस्या व पौर्णिमेला शेतकरी शेतात काम करत नाहीत. याचदिवशी दरवर्षी शेतकरी दिनाचे आयोजन करण्याचा मानस विद्यापीठाने व्यक्त केला आहे. हा कार्यक्रम विद्यापीठातील ग्रामीण कृषी कार्यानुभव विद्यार्थ्यांनी आयोजित केला आहे.
माजी पंतप्रधान चरणसिंग यांचा वाढदिवस ‘राष्ट्रीय किसान दिन’
भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा वाढदिवस 23 डिसेंबर ‘राष्ट्रीय किसान दिन’ म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) त्यांनीच स्थापना केली. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2001 मध्ये चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो आजही सुरू आहे.