मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी /कारवार
पर्यावरणाचे समग्र अध्ययनाच्या दृष्टिकोनातून राज्यातील पहिले पर्यावरण विश्वविद्यालय जिल्ह्यातील शिरसी येथे सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. विधानसभेचे अध्यक्ष आणि शिरसी-सिद्धापूरचे आमदार विश्वेश्वर हेगडे यांच्या सत्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आणि शिरसी-सिद्धापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना चालना देण्यासाठी रविवारी ते शिरसीच्या दौऱ्यावर आले असता अतिथीगृहात पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शिरसी येथे कृषी, बागायती आणि अरण्य महाविद्यालये कार्यरत आहेत. या तीन महाविद्यालयांचा समन्वय साधून बागायती पिके, कृषी, जैववैविधता, वन्यप्राणी रक्षण जनता अभिवृद्धी आणि पर्यावरणाचा समतोल साधणे ही उद्दीष्ट्यो डोळ्यासमोर ठेऊन शिरसी येथे पर्यावरण विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. नियोजित विश्वविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान आदी शाखांच्या शिक्षणाचीही सोय करण्यात येणार आहे. कारवार जिल्ह्यातील शिरसी, यल्लापूर आणि मुंदगोड तालुक्यातील अधिक तर प्रदेश अरण्याने व्यापलेला आहे. परिणामी या तिन्ही तालुक्यात अभिवृद्धी, नागरिकता आणि अरण्य रक्षण एकत्रीत नेण्याची आवश्यकता आहे. विकासासोबत वन्यप्रदेशाची व्याप्ती वाढवून पर्यावरण समतोल राखण्याची गरज आहे.
येथे पूर निवारण विकास प्रकल्प बहाल करताना अरण्यवासींची समस्या उभी ठाकते. कायद्यात अनेक अडचणी असूनही पूर परिस्थितीच्या वेळी अरण्यवासियांनी सरकारने नुकसानभरपाई मंजूर केली आहे. गरजूना घरे मंजूर करण्यात आली आहेत. पिढ्यान्पिढ्या वन्यप्रदेशात वास्तव्य करून जमीन कसणाऱ्यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही असून अरण्यवासीबद्दलची सरकारची भूमिका स्पष्टपणे केंद्र सरकारकडे मांडण्यात आली आहे. तीन पिढ्यांचा विचार न करता केवळ एकच पिढीचा विचार करून निर्णय घ्यावा आणि अरण्यवासियांनी हक्कपत्र बहाल करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती केंद्र सरकारला देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.
250 कोटी रुपयांच्या विकासकामांचे श्रेय कागेरी यांना
अलीकडच्या काळात जिल्ह्यात 42 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेले रुग्णालय 10 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेले लघुसिंचन प्रकल्प, 45 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेले सार्वजनिक बांधकामाची कामे आणि अन्य खात्यांच्या कामांसह एकूण 250 कोटी रुपयांच्या कामांना चालना देण्यात येणार आहे. आणि याचे सर्व श्रेय विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांना द्यावे लागते, असे बोम्मई यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या विभाजनाबद्दल मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय
अखंड कारवार जिल्ह्याचे विभाजन करून घाटमाथ्यावरील तालुक्यातील (जोयडा, दांडेली, हल्याळ, शिरसी, सिद्धापूर, यल्लापूर आणि मुंदगोड) शिरसी या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी गेल्या काही वर्षापासून केली जात आहे. अशाच आशयाची मागणी अन्य ठिकाणीही केली जात आहे. याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले.
यावेळी विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी, विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे, मंत्री शिवराम हेब्बार, मंत्री सी. सी. पाटील, विधान परिषद सदस्य शांताराम सिद्धी, आमदार सुनील नाईक आदी उपस्थित होते.