डम्बुल्ला / वृत्तसंस्था
सर्व क्रिकेट प्रकारातील नूतन कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ आज (गुरुवार दि. 23) श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 लढतीच्या माध्यमातून नवी सुरुवात करत आहे. आगामी बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत टी-20 क्रिकेटचे पदार्पण होत असताना आणि आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप अवघ्या आठ महिन्यांवर असताना त्यादृष्टीने भारतीय संघाची तयारी यानिमित्ताने सुरु होईल. मिताली राजने आपल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीचा समारोप केल्यानंतर भारतीय संघाला आता तिच्याशिवाय मैदानात उतरणे भाग असेल. 33 वर्षीय हरमनप्रीत कौरच्या खात्यावर 121 सामन्यात 2319 धावा असून मितालीचा विक्रम मोडण्यासाठी तिला आणखी 46 धावांची आवश्यकता आहे.