ऑनलाईन टीम / तरुण भारत :
हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, आंबा, गिरगाव, कुरुंदा या सहा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कयाधु, आसना, जलेश्वर या नद्यांना पूर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यावर असताना हिंगोलीतील पूर परिस्थितीचा फोनवरून आढावा घेतला. त्यानंतर पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला आलेल्या पूरामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी तात्काळ हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्तांची जेवणाची, राहण्याची सर्व व्यवस्था करावी. कोणतीही जीवितहानी होणार नाही, याला प्राधान्य द्यावे, तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली. काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे, असे निर्देश त्यांना दिले. प्रवासात असतानाच शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत हा आढावा घेतला आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
हेही वाचा : शिंदेंचं समर्थन भोवलं; सेनेतून दोन बड्या नेत्यांची हकालपट्टी