पुलाची दुसरी बाजू अर्धवट : अवजड वाहनांमुळे धोका
प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेटचे दुसऱ्या टप्प्याचे काम मागील वर्षभरापासून ठप्प आहे. यामुळे काँग्रेस रोडमार्गे उद्यमबागला जाणारी वाहने ब्रिजखालून वाहतूक करीत आहेत. अवजड वाहने ब्रिजखालून जाताना अनेक अडचणी येत असून ब्रिजखालील रस्ता अरुंद आहे. यामुळे अपघात केव्हा घडतील याचा नेम नाही. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत नसल्याने वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून तिसरे रेल्वेगेट येथील उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. परंतु, कोरोनाकाळात काम धिम्यागतीने सुरू होते. त्यामुळे उद्घाटनास विलंब झाला. नागरिकांच्या रेट्यामुळे उ•ाणपुलाचे काम पूर्ण झाले. परंतु, गुणवत्तेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. वास्तविक पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होताच दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात होणे गरजेचे होते. परंतु, दीड वर्षाचा कालावधी उलटला तरी कामाला सुरुवात झालेली नाही.
वर्षभरापूर्वी रस्त्याच्या एका बाजूला मुख्य उड्डाणपुलाशेजारी कॉलम घालण्यासाठी ख•s खणण्यात आले. दोन ते तीन ठिकाणी कॉलम उभे करण्यात आले. परंतु, तेव्हापासून हे काम ठप्प आहे. काँग्रेस रोडमार्गे खानापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी दुसऱ्या टप्प्यात उ•ाणपूल उभारला जाणार होता. उड्डाणपूल नसल्याने खानापूर रोडमार्गे उ•ाणपुलाच्या शेजारील सर्व्हिस रोडवरून अवजड वाहतूक सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अवजड वाहतूक बंद ठेवण्यासाठी कमान उभारण्यात आली होती. परंतु, रात्रीच्यावेळी अंदाज न आल्याने एका लॉरीने धडक दिल्याने ही कमान कोसळली.
रेल्वेगेट क्र. 381 च्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली असती तर वाहतूक कोंडीचाही प्रश्न सुटला असता. अरुंद सर्व्हिस रस्त्याने वाहतूक सुरू असल्याने अनेक अपघात होत आहेत. तसेच अवजड वाहनांची उंची जास्त असल्याने उ•ाणपुलाच्या खांबाला धडक बसत आहे. त्यामुळे तिसऱ्या रेल्वेगेटच्या कामाला लवकर सुरुवात करण्याची मागणी केली जात आहे.
काम थांबले कोठे?
2022 मध्ये तिसरे रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर 2023 च्या मार्चमध्ये उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी साहित्य दाखल झाले. लोखंड, मोठे खांब, क्रेन यासह इतर साहित्य आणण्यात आले. बीम घालण्याचे काम सुरूही झाले. परंतु, त्यानंतर रखडलेले काम वर्ष उलटले तरी अद्याप बंदच आहे. पावसाळ्याच्या दिवसात येथून ये-जा करणेही शक्य होत नाही.