पथदिपांसह डांबरीकरण पंधरा दिवसांत पूर्ण करणार : 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार
प्रतिनिधी /बेळगाव
तिसऱया रेल्वेफाटकावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. फुटपाथ, पथदीप आणि डांबरीकरणाचे काम येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कंत्राटदारांनी दिली. सध्या रस्ता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार आहे.
शहरातील विविध रेल्वेफाटकांवर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. तिसऱया रेल्वेफाटकावर वाहनांची गर्दी आणि होणाऱया वाहतूक कोंडीमुळे याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे काम तीन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. आठ महिन्यांत उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र हे काम तीन वर्षांनंतरही पूर्ण झाले नाही. हा रस्ता महत्त्वाचा असून शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या तिसऱया रेल्वेफाटकावर होणाऱया वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. रेल्वेफाटक बंद झाल्यानंतर तिसऱया रेल्वेफाटक परिसरात वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे उड्डाणपुलाची आवश्यकता होती. पण कोरोना आणि कामगारांच्या कमतरतेमुळे उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास विलंब झाला.
गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून त्रस्त झालेल्या वाहनधारकांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे.
दोन्ही बाजूच्या रॅम्पचे काम पूर्ण
सध्या उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून दोन्ही बाजूच्या रॅम्पचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याच्या एका बाजूला फुटपाथ निर्माण करण्यात येत आहे. तसेच पथदीप उभारण्याचे काम आणि रॅम्पवर बिटुमिन काँक्रिट घालण्याचे काम सुरू आहे. उर्वरित कामे पूर्ण करून डांबरीकरण करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत सर्व काम पूर्ण करून रेल्वेखात्याच्या सूचनेनंतर हे उड्डाणपूल वाहतुकीला खुले केले जाईल. त्यादृष्टीने ही कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असल्याची माहिती कंत्राटदार मंजुनाथ यांनी दिली.