पंतप्रधान मोदींचा विश्वास, 20 हजार कोटींच्या योजना घोषित
@ जम्मू / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत आता झपाटय़ाने परिवर्तन होत आहे. मागच्या पिढीतील नागरीकांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागले, तशी परिस्थिती तरुणांवर येणार नाही. केंद्र सरकारने राज्याच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत केले असून रोजगार, व्यापार आणि आर्थिक विकास यांना प्राधान्य दिले आहे. याचा लाभ या राज्यातील तरुणांना होणार असून त्यांचे भवितव्य आज उज्ज्वल आहे, असे विश्वासपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे बोलताना काढले. त्यांच्या हस्ते राज्यासाठी 20 हजार कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन करण्यात आले.
जम्मू येथील सांबा विभागातील पल्ली येथे हा कार्यक्रम ‘पंचायती राज’ दिनानिमित्त आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यभरातून 30 हजार स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात आता लोकशाही तळागाळापर्यंत पोहचली आहे, हे स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांना जो प्रतिसाद मिळाला त्यावरुन स्पष्ट होते, असेही प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.
2019 मध्ये जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे घटनेचे अनुच्छेद 370 आणि 35 अ हे निष्प्रभ करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींची ही राज्याची प्रथमच भेट होती. येत्या 25 वर्षांमध्ये जम्मू-काश्मीर विकासाचा एक ना अध्याय लिहिणार आहे आणि त्यात युवकांचा पुढाकार राहणार आहे. राज्याला विकासापासून कोणीही वंचित ठेवू शकणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
20 हजार कोटींच्या योजना
पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्याच्या विकासासाठी 20 हजार कोटी रुपये खर्चाच्या कनेक्टिव्हीटी आणि वीज उत्पादनाच्या योजनांचे उद्घाटन केले. यात 500 मेगावॅटच्या सौर वीज प्रकल्पाचाही समावेश आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे युवकांना रोजगार मिळणार असून राज्याच्या आर्थिक विकासाचा वेग वाढणार असून त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. राज्यामध्ये यापुढच्या काळात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक येऊ शकेल. विविध देशही गुंतवणूक करण्यास तयार आहेत, असे यावेळी प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
पददलितांना मिळणार लाभ
या भागातील दलित, महिला, बालके आणि इतर दुर्बल घटकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे, ही अभिमानाची बाब आहे. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी आज प्रथमच येथील वाल्मिकी समाजाला इतर कोणत्याही नागरीकाच्या तोडीचा दर्जा मिळाला आहे. जणू या आणि अशा समाजातील लोकांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी खरे स्वातंत्र्य मिळाले आहे. 500 मेगावॅटच्या एका सौरवीज केंद्राची निर्मिती अवघ्या तीन आठवडय़ात करण्यात आली असून आता ही वीज लोकांपर्यंत पोहचू लागली आहे. यामुळे लोकांचा विश्वास दुणावला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.
प्रत्येक घरातून 20 रोटय़ा
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला 30 हजारांहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. या साऱयांच्या भोजनाची व्यवस्था पल्ली गावातील लोकांनीच केली. यासाठी प्रत्येक घरातून 20 रोटय़ा संकलित करण्यात आल्या होत्या. तसेच पल्ली हे गाव पूर्णतः ‘शून्य उत्सर्जन’ ग्राम म्हणून घोषित करण्यात आले.
विकासाचा राजमार्ग मोकळा
ड 20 हजार कोटींच्या योजनांमध्ये वीज निर्मितीवर भर
ड विक्रमी अल्प कालावधीत सौर वीज प्रकल्पाची पूर्तता
ड युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारचा प्रयत्न ड पंचायती राज दिन कार्यक्रमासाठी 30 हजार उपस्थित