पुणे : पुणे पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे यंदा पुण्यात शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली गणपती विसर्जन मिरवणूक अद्याप २७ तासानंतरही सुरूच आहे. काल मानाच्या गणपती विसर्जनाला पहिल्यांदाच रात्रीचे ९.३० वाजले. यामुळे मागे असलेली मंडळे ही हळूहळू पुढे सरकत होती. तसेच गणेशभक्तांची अलोट गर्दी असल्याने व ती पोलिसांनी नियंत्रित न केल्याने विसर्जन मिरवणुकीचे नियोजन कोलमडले. असे असले तरी ही मिरवणूक लवकर संपवण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले. पण संध्याकाळ पर्यंत ही मिरवणूक संपण्याची चिन्हे अद्याप तरी दिसत नाहीत.
दरवर्षी दगडूशेठ गणपतीला अलका चौकात येण्यासाठी पहाटे ५ किंवा ६ होतात. यावेळी या गणरायाचे विसर्जन झाले असते. मात्र, आज सकाळी ९.४५ च्या सुमारास अखिल मंडई मंडळ अलका चौकात आले. त्या नंतर १०.१५ ला दगडूशेठ गणपती हा अलका चौकात आला. मंडळात असलेल्या वाद्य पथकमध्ये मोठे अंतर पडले होते. त्यांना घाई करण्यासही पोलीस काहीच करत नव्हते. त्यात गर्दीचे नियोजन सुद्धा केले जात नव्हते. भर अलका चौकत नागरिक थांबल्याने मंडळांना पुढे जाण्यास अडचणी येत होत्या. शनिवारी सकाळी सात वाजले तरी प्रमुख मंडळे मुख्य विसर्जन मार्गावर पोहचली नव्हती. गणपतींच्या रथासमोर असलेली ढोल-ताशा पथके, डिजे विसर्जन मिरवणुकांना उशीर होण्यास कारणीभूत ठरले.
दरम्यान, या नियोजन शून्य कारभाराबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना प्रश्न करण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, आज विसर्जन मिरणूक वेळेत संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मिरवणुकीतील ढोल ताशा पथकांमध्ये पडलेल्या अंतरामुळे विसर्जनासाठी वेळ लागला आहे. विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. त्यादृष्टीने संबंधित मंडळांसोबत झालेल्या बैठकमध्ये सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, ढोल-ताशा पथकांमुळे मिरवणुकांना विलंब झाला असे गुप्ता म्हणाले.