भगवान श्रीकृष्णाची नगरी ‘द्वारका’च्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच द्वारकाधीशाच्या मंदिराचे दरवाजे मध्यरात्री खुले करण्यात आले आहे. बुधवारी रात्री हा प्रकार घडला आहे. मंदिराचे दरवाजे कुणा व्हीआयपीसाठी नव्हे तर 25 गायींसाठी उघडण्यात आले होते. भगवान द्वारकाधीशाचे दर्शन करण्यासाठी या गायी सुमारे 450 किलोमीटरची पायपीट करून कच्छहून द्वारकेत पोहोचल्या होत्या.
कच्छमध्ये राहणारे अन् भगवान द्वारकाधीशाचे भक्त महादेव देसाई यांच्या पशुशाळेतील 25 गायी सुमारे दोन महिन्यांपूर्वी लम्पी विषाणूने संक्रमित झाल्या होत्या. यादरम्यान पूर्ण सौराष्ट्रात लम्पी विषाणूंमुळे गायी मृत्युमुखी पडत होत्या. अशा स्थितीत देसाई यांनी गायी रोगमुक्त झाल्या तर या गायींसोबत भगवान द्वारकाधीशाच्या दर्शनासाठी येईल असा नवस केला होता.
गायी झाल्या रोगमुक्त
भगवान द्वारकाधीशावर सर्वकाही सोडून मी गायींच्या उपचारात लागलो. काही दिवसांनी गायी बऱया होत गेल्या. सुमारे 20 दिवसांनी सर्व 25 गायी पूर्णपणे रोगमुक्त झाल्या. एवढेच नाही तर पशुशाळेतील अन्य गायींमध्येही लम्पी विषाणूचे संक्रमण फैलावले नाही. या गायी बऱया झाल्यावर मी त्यांना घेऊन कच्छहून द्वारकेसाठी रवाना झाल्याचे देसाई यांनी सांगितले आहे.
मंदिर प्रशासनाचा निर्णय
गायींना मंदिरात कसा प्रवेश द्यावा असा प्रश्न मंदिर प्रशासनासमोर उभा ठाकला होता. दिवसभरात येथे हजारो भाविकांची गर्दी असते. अशा स्थितीत गायी आत पोहोचल्यास मंदिरातील व्यवस्था बिघडण्याची भीती होती. याचमुळे मंदिर मध्यरात्री खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यरात्री 12 वाजल्यानंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. या गायींना मंदिरात प्रवेश देत द्वारकाधीशाचे दर्शन घडविण्यात आले.
मंदिराला प्रदक्षिणा
द्वारका येथे पोहोचून भगवान द्वारकाधीशाचे दर्शन घेतल्यावर या गायींनी मंदिराची प्रदक्षिणाही पूर्ण केली आहे. यावेळी मंदिर परिसरात अनेक लोक गायींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मंदिराच्या पुजाऱयांनी प्रसादासह गायींसाठी चाऱयापाण्याची व्यवस्था केली होती.