विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा घणाघात,
प्रतिनिधी/ दहिवडी
50 लोकांचे सरकार राज्यातील विकासकामाचा आराखडा बनवायचे सोडून अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात जास्त दंग झाले आहेत. त्यांनतर माणमध्ये सुद्धा गलिच्छ राजकारण तात्यांच्या नंतर सुरु झाले, असे प्रतिपादन अजित पवार यांनी मार्डी येथील स्वर्गीय माजी आ. सदाशिवराव पोळ तात्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात केले.
यावेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, नितीनकाका पाटील, प्रभाकर देशमुख, युवा नेते मनोज पोळ, सोनालीताई पोळ, श्रीराम पाटील, सुनील पोळ, युवराज सूर्यवंशी, दिलीप तुपे, बाळासाहेब सावंत, इत्यादी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, मी मंत्रालयात गेल्यानंतर मला कर्मचारी सांगतात की, दादा 50 लोकांचे सरकार फक्त आमच्या बदल्या करण्यात व्यस्त झाले आहे. मर्जीतले अधिकारी आपापल्या भागात आणण्यासाठी आग्रही आहेत त्यामुळे आम्हाला नाहक त्रास होतोय. त्यामुळे दादा हे कुठेतरी थांबवा.
माणमधील राजकारण हे अतिशय खालच्या पद्धतीचे सुरु झाले आहे. तात्यांच्या काळात असे कधीच झाले नाही. त्यांनी कायम राष्ट्रवादीसोबत राहून तालुक्याचा विकास करताना सर्वात जास्त पाझर तलाव त्याकाळात माणमध्ये बांधले. विकासासाठी तात्या नेहमी पवारसाहेबांकडे भांडायचे. असे करुन तात्यांनी माणमध्ये भरपूर विकासकामे केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती मिळविण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने राहिले पाहिजे. येत्या लोकसभेला माढा मतदार संघातून पवार साहेबांच्या विचाराचा खासदार निवडून द्या. कारण माढा हा पवार साहेबांचा मतदार संघ म्हणून महाराष्ट्रभर ओळखला जातो. तुमचा ऊस चांगल्या कारखान्याला घाला, ज्याचा काटा चांगला असेल, बिल वेळेवर मिळेल अशाच ठिकाणी ऊस घाला नाहीतर पुन्हा माझ्याकडे तक्रार घेऊन येऊ नका. अधिकाऱयांनो कोणाच्या दबावाला बळी पडून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे. कार्यकर्ता चुकला तर जरूर कारवाई पण नाहक त्रास देऊ नका, सत्ता बदलत असते.
कॉरिडॉर मी पळवला नाही-रामराजे
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, तुम्हाला पाणी मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही. तोपर्यंत मला काळे झेंडे दाखवा नाहीतर अजून काही दाखवा मला फरक पडत नाही. मी काळ्या झेंडय़ाना भीत नाही. कॉरिडॉर मी पळविला नाही, कॉरिडॉर जिह्याचा आहे. दुष्काळी भागात कॉरिडॉर झाला पाहिजे हा माझा आग्रह आहे. सदाशिवराव पोळ तात्यांच्या काळात गटातटाचे राजकारण कधीच झाले नाही त्यामुळे सर्वांनी तात्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपापसातील हेवेदावे संपवून टाका. तुम्हांला कोणीही रोखू शकत नाही.
माणमध्ये राष्ट्रवादीचा सूर्य उगवला पाहिजे
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, माण हा जिह्याच्या उगवत्या दिशेला आहे. त्यामुळे माणमध्ये राष्ट्रवादीचा सूर्य उगवला पाहिजे. माण ही बुद्धीवंतांची आणि शूरविरांचा खाण आहे त्यामुळे इथे त्याला शोभेल असा आमदार तुम्ही द्या असा सल्ला माणवासियांना दिला.
सदाशिव पोळ तात्या जिहे कठापूरचे खरे जनक
प्रभाकर देशमुख म्हणाले की, जिहे कठापूरचा पाहिला आराखडा स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव पोळ तात्यांनी केला. माण सुजलाम सुफलाम करण्यासाठी पहिला प्रयत्न तात्यांनी केला. त्यामुळे जिहे कठापूरचे खरे जनक सदाशिव पोळ तात्या आहेत. खोटय़ा कामाचे श्रेय घ्यायची पद्धत माणमध्ये काही दिवसांपूर्वी सूरु झाली आहे. आम्ही कधीही लबाडीचे राजकारण करणार नाही. आम्हाला विकासाचे आणि बेरजेचे राजकारण करायचे आहे. माणमधील शेतकरी हा जास्तीत जास्त दुग्धव्यवसायावर अवलंबून असतो. परंतु दुधाला भाव मिळत नाही त्याकरिता आमचा आग्रह आहे की दुधाला प्रतिलीटर 70 ते 80 रुपये भाव मिळाला पाहिजे. म्हसवडला औद्योगिक कॉरिडॉर झाला तर लाखों युवकांना रोजगार मिळेल आणि येथील बेरोजगारी कायमची दूर होईल त्यामुळे औद्योsगिक कॉरीडॉर म्हसवडलाच झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वाटेल तो प्रयत्न करू अशी गाव्ही प्रभाकर देशमुख यांनी दिली.