काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची टीका
प्रतिनिधी /पणजी
स्वयंपूर्ण गोवा, पर्यटनाभिमूख राज्य बनविणे यासारख्या घोषणा करणारे मुख्यमंत्री प्रत्यक्षात मात्र गोव्याला गुन्हेगारीचे राज्य बनवू पाहात आहेत. त्यांच्या अशा भूमिकेमुळे गोवा हे पर्यटन क्षेत्र नव्हे तर जंगलराज बनेल, अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
पणजीत काल शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वोलान्सियो सिमोईश, पॅप्टन वेरियाटो, एल्वीस गोम्स, म्हांबरे, संजय बर्डे, आदींची उपस्थिती होती.
कायदा-सुव्यवस्था ढासळली?
गत काही दिवसात राज्यात अनेक गुन्हेगारी घटना, प्रकरणे घडली असून एकाचाही योग्य प्रकारे तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. यावरून राज्यात कायदा सुव्यवस्था पार ढासळली असल्याचेच सिद्ध होत आहे, असे पाटकर म्हणाले. मुख्यमंत्री केवळ स्वप्नांच्या दुनियेत वावरत आहेत. त्यातून राज्यात काय चालले आहे याचीसुद्धा त्यांना जाणीव नाही. एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे एकतर स्वतः गृहमंत्री पोलिसांना योग्य प्रकारे तपास करू देत नाहीत किंवा पोलीस योग्य प्रकारे काम करत नाहीत, असेच दिसून येते.
फोगट प्रकरणांतून गोव्याची बदनामी
सोनाली फोगट प्रकरणातून तर राज्याची देशभरातच नव्हे तर विदेशातही बदनामी चालली आहे. तरीही मुख्यमंत्री गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारीची एकेक प्रकरणे घडत आहेत. हल्लीच्या कित्येक वर्षात राज्यात कुणावर गोळीबार करण्याची घटना घडली नव्हती. ऐन चतुर्थी उत्सव सुरू असतानाच तिही घटना घडली. त्यातून एकाचा बळीही गेला. यावरूनच राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीचा अंदाज येतो, असे पाटकर म्हणाले.
गोळीबार प्रकरणात राजकीय हस्तक्षेप
कुडचडे येथे रेती माफियांकडून घडलेल्या या गोळीबार प्रकरणात थेट राजकीय हस्तक्षेप असल्याचेच सिद्ध होत आहे, त्याचबरोबर बेकायदेशीर रेती व्यवसायातही बडय़ा राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे, या अंदाजाला पुष्टी मिळते, असा दावा पाटकर यांनी केला आहे. तसे नसेल तर पोलिसांनी त्वरित खऱया आरोपीस अटक करावी, तसेच कोणत्या राजकीय व्यक्तीच्या आशीर्वादाने हा बेकायदेशीर रेती व्यवसाय सुरू आहे त्याचाही खुलासा करावा, असे आव्हान त्यांनी दिले.
सदर प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत सपशेल अपयशी ठरले असून त्यांनी बाळगलेल्या मौनावरून त्यांचाही रेती व्यवसायात हात आहे की काय, असा संशय पाटकर यांनी व्यक्त केला.
राज्यभरातील रेती उत्खनन करणाऱयांना अटक करा
गोळीबार प्रकरणानंतर बेकायदा रेती उत्खनन केल्याप्रकरणी 379 कलमाखाली आतापर्यंत केवळ पाच जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यात अनेक भागात बेकायदेशीररित्या रेती उत्खनन करण्यात येते, याची पूर्ण जाणीव सरकार आणि खाण खात्याला आहे. त्यामुळे त्याच कलमाखाली संपूर्ण राज्यातील रेती उत्खनन करणाऱयांना अटक करणे क्रमप्राप्त होते. परंतु तसे झाले नाही, असे पाटकर म्हणाले. खरे तर रेती उत्खननास न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही राज्यात खुलेआम रेती उत्खनन होतेच कसे? राज्याच्या खाण तसेच पर्यावरण खाते यांनी या विरोधात कोणती कारवाई केली आहे? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
राज्यात 2012 पासून खाणी बंद पडल्यामुळेच लोकांना पर्यायी व्यवसाय शोधावे लागले. त्यातूनच काहीजण रेती, चिरे, आदी यासारख्या धंद्यांकडे वळले. मात्र त्यांच्यावर कारवाई न करता या सरकारने त्यांना लाचार बनवत स्वतःच्या हाताखाली ठेवले आहेत, असे पाटकर म्हणाले.
दरम्यान, या प्रश्नी बोलताना वोलान्सियो यांनी रेती, चिरे यासारखी गौण खनिजे उत्खननासाठी सरकारने परवाने द्यावे, अशी मागणी केली. पॅप्टन वेरियाटो यांनी स्थानिक आमदार तथा साबांखा, पर्यावरण, यासारखी महत्वाची खाती सांभाळणारे मंत्री नीलेश काब्राल यांच्यावर अकार्यक्षमतेची टीका केली. अन्य उपस्थितांनीही विचार मांडले.