दर कमी करण्यासाठी पावले उचलत आहोत : सीतारामन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
खाद्यतेलाचे दर भडकल्याने सरकारची चिंता वाढली आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्षानंतर खाद्यतेलांच्या आयातीकरता भारत नव्या पुरवठादारांचा शोध घेण्याचा विचार करत आहे. भारत खाद्यतेलाचा अत्यंत मोठा हिस्सा आयात करत असल्याचे विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्षामुळे भारताला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागल्याचे त्या म्हणाल्या.
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असल्याचे सर्वजण जाणून आहेत. खाद्यतेल आयात करण्यात अनेक समस्या आहेत. खाद्यतेलाची आयात करणे अवघड ठरत चालले आहे. युक्रेनमधून भारताला सूर्यफुलाचे तेल पुरविले जात होते. परंतु युद्धामुळे यात अडथळा निर्माण झाला आहे. सरकार आता अनेक अन्य बाजारांमधून खाद्यतेलांची आयात करत आहे. नव्या बाजारांवरही विचार सुरू असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
युक्रेन-रशिया संघर्षामुळे उद्योजकांसाठी देखील निर्यातीकरता संबंधित बाजारपेठांमध्ये संधी निर्माण झाल्या आहेत. यापूर्वी युक्रेन आणि रशिया काही बाजारांमध्ये निर्यात करत होते. आता ते निर्यात करू शकत नाहीत. उद्योगपतींनी प्रत्येक आव्हानाकडे संधीत रुपांतरित करण्याची संधी म्हणून पहावे. केंद्र सरकार उद्योगपतींना समर्थन देण्यासाठी सदैव तयार असल्याचे सीतारामन यांनी नमूद पेले आहे.
इंडोनेशियाकडून निर्यातबंदी
इंडोनेशिया आणि मलेशिया हे भारताचे पामतेलाचे मुख्य पुरवठादार आहेत. कच्चे सोयाबीन तेल मुख्यत्वे अर्जेंटीना आणि ब्राझीलमधून आयात करण्यात येते. तर कच्चे सूर्यफुल तेल युक्रेन आणि रशियामधून आयात केले जात राहिले आहे. इंडोनेशियाकडून खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने आणि अन्य कारणांमुळे खाद्यतेलाचे दर वाढू लागले आहेत.