संपूर्ण आर्थिव वर्षाचा विकास दर 8.7 टक्के, अनुमानापेक्षा किंचित कमी, शेवटच्या तिमाहीत घट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाची अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने सुधारत असल्याचा संकेत प्राप्त झाला आहे. 2021 ते 2022 या वित्तवर्षात देशाच्या विकासाची वाढ 8.7 टक्के या दराने झाली. मात्र युपेन युद्ध आणि जागतिक पुरवठा साखळय़ांचा विस्कळीतपणा यामुळे गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या आणि शेवटच्या तिमाहीत विकासदरात घट दिसून आली असून हा दर अवघा 4.1 टक्के राहिला. मात्र, पहिल्या तीन तिमाहींमध्ये विकास दर समाधानकारक राहिला. मात्र, अर्थसंकल्पीय अनुमानापेक्षा तो काहीसा कमी राहिला आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने ही माहिती दिली आहे.
या संपलेल्या वित्तवर्षाच्या प्रारंभी 8.9 टक्के विकासदराचे अनुमान व्यक्त करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष विकासदर त्यापेक्षा 0.2 टक्क्यांनी कमी राहिला आहे. या वर्षांच्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये भारताचा विकास दर जगात सर्वात जास्त राहिला. कोरोनाकाळातील मळभ झटकून अर्थव्यवस्था वेगाने उभी राहील असे चित्र निर्माण झाले होते. तथापि, शेवटच्या तिमाहीत युपेनमध्ये युद्ध सुरु झाल्याने महागाई वाढल्याने आणि आयात कराव्या लागणाऱया वस्तूंचा पुरवठा कमी झाल्याने अर्थव्यवस्थेचा वेग पुन्हा मंदावला, असे विश्लेषण करण्यात आले.
वित्तीय तूट कमी झाल्याने समाधान
अर्थव्यवस्थेचा एकंदर विकास दर काहीसा कमी राहिला असला तरी वित्तीय तूटही अनुमानापेक्षा कमी दिसून आली आहे. वित्तीय तूट स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) 6.9 टक्के राहील असे अनुमान आधी व्यक्त करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षत ही तूट 6.71 टक्के राहिली आहे. यामुळे विकास दरात अनुमानापेक्ष किंचित कमी राहिल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन निघाली आहे. वित्तीय तूट या वर्षात एकंदर 15,86,537 कोटी रुपये राहिलेली आहे.
राजस्व उत्पन्नात वाढ
संपलेल्या आर्थिक वर्षात राजस्व उत्पन्न 21.68 लाख कोटी रुपये इतके होते. ते अनुमानापेक्षा चार टक्के जास्त राहिले. शुद्ध कर उत्पन्न 18.2 लाख कोटी रुपयांचे होते. मात्र विदेशी गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करण्यात मात्र सरकार बरेच मागे राहिले आहे. निर्गुंतवणूक आणि विविध परिसंपत्ती विक्रीतून 78 हजार कोटी रुपयांची प्राप्ती होईल असे अनुमान मांडण्यात आले होते. तथापि, हे उत्पन्न केवळ 14 हजार कोटी इतकेच मिळाले आहे. काही निर्गुंतवणूक योजना पुढे ढकलाव्या लागल्याने हे लक्ष्य गाठले गेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
प्रमुख क्षेत्रांच्या उत्पादनात मोठी वाढ
भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात चांगले वृत्त उत्पादन क्षेत्राकडून आले आहे. आठ महत्वाच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये उत्पादनात एप्रिलमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पायाभूत मानल्या गेलेल्या आठ औद्योगिक क्षेत्रांमधील उत्पादनवाढ एप्रिल 2022 मध्ये गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 8.4 टक्के अधिक आहे. त्याच प्रमाणे मार्च 2022 या महिन्यातील उत्पादनवाढीलाही एप्रिल 2022 मधील उत्पादनवाढीने मागे टाकले आहे. मार्चमध्ये वाढ केवळ 4.9 टक्के वाढ झाली होती. ती एप्रिलमध्ये साडेतीन टक्के जास्त आहे. कोळसा, वीज, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद आणि सिमेंट अशी ही आठ मूलभूत क्षेत्रे आहेत, अशीही माहिती सरकारने दिली आहे.