वाराणसी न्यायालयाकडून 12 सप्टेंबरला निकाल अपेक्षित
वाराणसी / वृत्तसंस्था
वाराणसीतील ज्ञानवापी विवादप्रकरणी न्यायालयाने 12 सप्टेंबरपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालय आता 12 सप्टेंबर रोजी निकाल देणार आहे. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी मशीद आणि शृंगार गौरीप्रकरणाचा वाद न्यायालयापर्यंत पोहोचलेला आहे. आता 12 सप्टेंबर रोजी न्यायालय यावर निर्णय देणार असून त्यादिवशी या प्रकरणाची पुढील सुनावणी सुरू ठेवायची की नाही? याचा निर्णय होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात खटल्याच्या गुणवत्तेबाबत झालेल्या सुनावणीत हिंदू व मुस्लीम पक्षकारांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला.
गतवषी दिवाणी न्यायाधीश (वरि÷ विभाग) यांच्या न्यायालयात फिर्यादी राखी सिंगसह पाच महिलांनी शृंगार गौरीचे पूजन करून ज्ञानवापी सुपूर्द करण्याच्या मागणीसाठी अपिल केले होते. प्रतिवादी अंजुमन इंतजामिया मस्जिद यांनी याप्रश्नी अर्ज दाखल करत खटल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर न्यायालयाने प्रतिवादीचा अर्ज बाजूला ठेवत फिर्यादीची मागणीही ऐकून घेतली. याचदरम्यान ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण करून अहवाल मागविण्यात आला. यानंतर अंजुमन इंतजामिया मस्जिदने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मुस्लीम पक्षाच्या विशेष रजा याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
26 मेपासून सुरू झालेल्या सुनावणीत, 4 ऑगस्टला अंजुमन इंतजामिया मस्जिदच्यावतीने सिव्हिल प्रोसिजर ऑर्डर 07 नियम 11 (मेरिट) अंतर्गत खटला निकाली काढण्यात आला आणि युक्तिवाद करण्यात आला. यानंतर हिंदू पक्षातर्फे ज्ये÷ वकील हरिशंकर जैन आणि इतरांनी युक्तिवाद केला. मंगळवारी जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात प्रतिवादी अंजुमन इंतजामिया मस्जिद कमिटीच्या बाजूने एक पत्रदेखील सादर करण्यात आले. या पत्रात ज्ञानवापी संकुल ही ‘वक्फ’ची मालमत्ता असल्याचे नमूद केले होते. वादीचे अधिवक्ता विष्णूशंकर जैन यांच्या विशेष विनंतीवरून बुधवारीही युक्तिवाद झाला. ज्ञानवापी मशीद ही वक्फची मालमत्ता असल्यामुळे ज्ञानवापी मशिदीशी संबंधित प्रकरणावर सुनावणी करण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाचा नसून वक्फ बोर्डाकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. तत्पूर्वी मंगळवारी प्रतिवादी वकील शमीम अहमद यांनी ज्ञानवापी मशीद ही वक्फची मालमत्ता असल्याचे सिद्ध करण्यासाठी संबंधित फाईल्स सादर केल्या. या मालमत्तेची राज्य सरकारच्या राजपत्रात नोंद आहे. यावरून ज्ञानवापी मशीद जुनी असल्याचे सिद्ध होते, असे त्यांचे म्हणणे आहे.