प्रतिनिधी /वास्को
वास्कोतील मांगोरहिल मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची उंची वाढवण्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. रेल्वे अधिकाऱयांनी या पुलाची उंची वाढवण्याची तयारी दर्शवलेली असून सध्या होऊ घातलेल्या रेलमार्ग दुपदरीकरणाच्या कामातच हे काम हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. मंत्री माविन गुदिन्हो व आमदार दाजी साळकर यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला होता.
वास्को शहर ते मांगोरहिल भागाला जोडणाऱया रस्त्यावर हॉटेल तानियाच्या समोरच असलेला रेल्वेचा उड्डाण पुल पुरेशा उंची अभावी अडचणीचा ठरत आहे. उंच वाहने या मार्गावरून ये जा करू शकत नाहीत. केवळ छोटय़ा प्रवासी बसगाडय़ा या उड्डाण पुलाखालून वाट काढू शकतात. अग्निशामक दल तसेच काही वेळा रूग्णवाहिकांना या अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा वाहनांना व इतर अवजड वाहनांनाही लांबच्या दूसऱया मार्गाने मांगोरहिल किंवा शहराला जवळ असलेल्या भागांमध्ये जावे लागते. 27 वर्षांपूर्वी या रेलमार्गाचे रूंदीकरण करताना त्याची उंची कमी करण्यात आली होती. त्यावेळी या कामाची कुणी दखल घेतली नसल्याने पुढे या मार्गावरील वाहतुकीसमोर अडचणी उभ्या राहिल्या. काही वेळा शहरात नवीनच आलेली वाहने चालकांना या पुलाच्या उंचीची कल्पना नसल्याने येऊन तेथील लोखंडी कमानीना धडक देतात. सध्या वास्को व दाबोळी भागात रेल्वे दुपदरीकरणाचे काम वेगाने होत आहे. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा रेल्वे व सरकारसमोर मांडण्यात आलेला आहे. हा प्रश्न केंद्र सरकारकडेही पोहोचलेला आहे. हा उड्डाण पूल उंच करण्यासाठी प्रक्रियेला सुरुवात झालेली असल्याचे आमदार दाजी साळकर यांनी म्हटले आहे.
वास्को मायमोळेतील कब्रस्थानच्या सुरक्षेसाठी रेल्वे सहकार्य करणार
वास्को व दाबोळी क्षेत्रातील रेल्वेशीसंबंधित विविध प्रश्नावर नुकतीच एक बैठक वास्कोत झाली. या बैठकीला मंत्री माविन गुदिन्हो, आमदार दाजी साळकर तसेच रेल्वेचे काही वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. रेल्वेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱयांनी मंत्री व आमदारांना दिले आहे. यात प्रामुख्याने वास्कोतील या उड्डाण पुलाचा समावेश होता. वास्को मायमोळेतील कब्रस्थानचाही प्रश्न या बैठकीत चर्चेस आला. काही दिवसांपूर्वी रेल्वेने दुपदरीकरणाच्या कामासाठी खोदकामा करताना कब्रस्थानमधील काही कबरींचे नुकसान केले होते. त्यामुळे धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार घडला होता. रेल्वमार्गाच्या दुपदरीकरणासाठी रेल्वे विकास निगम रेल्वेच्याच मालमत्तेत काम करीत असली तरी कब्रस्थानला धक्का पाहोचणार नाही यासाठी काही प्रमाणात तडजोड करण्याची मागणी मंत्री माविन गुदिन्हो व आमदार दाजी साळकर यांनी रेल्वेकडे केली आहे. रेल्वेनेही अगदीच आवश्यक असलेल्या जागेतच काम करून कब्रस्थानमधील कबरींना धक्का पोहोचणार नाही यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.