सदरक्षणाय, खलनिग्रहणाय पोलीस दलाच्या या ब्रिदवाक्याप्रमाणे स्वतःचे आयुष्य खर्ची घालत सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्याची शपथ त्याने घेतली होती. हायप्रोफाइल गुन्हे, व्हाईट कॉलर गुन्हेगारांच्या मुसक्या तर आवळल्याच मात्र अनेक गुन्हेगारांना वाल्याचा वाल्मिकी करीत सुधारण्याची संधी दिली. तर समाजाचे आपण देणे लागतो हे समजून अनेक समाजोपयोगी कामे करीत पोलीस दलातील हा सूर्य अखंडपणे तळपत राहिला. अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असलेल्या दिनकर मोहिते यांना मानाचा मुजरा !
तो काळ 1990 चा होता. मुंबईसह संपूर्ण राज्यात संघटीत गुन्हेगारी टोळ्य़ा आणि गँगस्टरांनी धुमाकुळ घातला होता. पाहिल त्या ठिकाणी गँगवॉर आणि रक्ताचा खच पडला होता. कोठून कसा आणि कोणाचा गोळी जीव घेईल याचा नेम नव्हता. सामान्य माणूस तर सोडाच पोलीस दल देखील दहशतीखाली होते. एवढा गँगवॉर मुंबईत सुरु होता. त्यातच 1994 साली राज्यात सत्ता पालट झाला आणि शिवसेना-भाजपची सत्ता आली. मात्र तरीदेखील गुन्हेगारी थांबायचे नाव घेत नव्हती. अशातच तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी पोलीस दलाला नवीन शस्त्र दिले. ते शस्त्र म्हणजेच एन्काउंटर नावाचे ब्रम्हास्त्र. हे शस्त्र हाती येताच, पोलीस दलातील तडफदार पोलीस अधिकाऱयांनी गँगस्टरांचे एन्काउंटर करण्यास सुरुवात केली. यामुळे संतापलेल्या अनेक संघटीत टोळ्य़ांनी पोलिसांच्या कुटुंबियांना धमकावण्यास सुरुवात केली. ज्यावेळेस कुटुंबियांवर घाला होतो, त्यावेळेस एक तर व्यक्ती घाबरुन जाते अथवा त्वेषाने लढते. नेमके तेच झाले अनेक अधिकाऱयांनी कुटुंबियांकडे डोळेवर करणाऱयांचा खात्मा करण्यास सुरुवात केली. यावेळी आघाडीवर होते तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दिनकर मोहीते.
दिनकर मोहीते यांचा जन्म पुणे जिह्यातला. लहानपणापासूनच समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकीचे धडे मिळालेल्या दिनकर मोहीते यांनी पोलीस दलात सेवा करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांची राज्य लोकसेवा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. गडचिरोलीत असताना नक्षलवाद्यांशी चार हात केल्याप्रकरणी त्यांना त्यावेळी अनेकदा गौरविण्यात आले. एवढेच नाही तर गडचिरोली येथील आदिवासी बांधवांमध्ये त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. यामुळे या आदिवासी बांधवांच्या मदतीने त्यांनी अनेक नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळल्या तर अनेकांना कंठस्नान घातले. त्यानंतर त्यांनी मुंबईत कामाचा धडाका सुरु केला. यावेळी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना अनेकदा त्यांना अंडरवर्ल्डमधील गँगस्टरकडून मारण्याच्या धमक्या येण्यास सुरुवात झाली. नेमके यादरम्यान, एक सराईत गँगस्टर मुंबईत आला होता. यावेळी त्याला अटक करु नये, यासाठी त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांकडून त्यांच्यासह वरिष्ठांवर दबाव येण्यास सुरुवात झाली होती. मात्र दिनकर मोहीते यांची कर्तव्यतत्परता आणि कामाबद्दल असलेली निष्ठा पाहता, त्यांच्या वरिष्ठांनीदेखील ‘तू करशील ती पूर्व दिशा’ असे सांगून सर्व राजकीय दबाव झुगारला होता. त्यानंतर दिनकर मोहीते त्यांच्या पथकासह या गँगस्टरला अटक करण्यासाठी गेले असता, या गुंडाने त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत मोहीते यांनी या सराईत गँगस्टरचा खात्मा केला.
या गँगस्टरचा खात्मा झाल्याने, याची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने घेतली. दिनकर मोहीते यावेळी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या गळ्यातील ताईत बनले. तर अंडरवर्ल्डमधील अनेक गँगस्टरांनी त्यांच्या नावाचा धसका घेतला. त्यानंतर दिनकर मोहीते यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अनेक क्लिष्ट गुह्यांचा तपास त्यांनी केला. तर परराज्यात जाऊन अनेक गुन्हेगारांच्या त्यांनी मुसक्या आवळल्या. पोलीस ठाणे असो अथवा कोणतेही पथक असो या ठिकाणी काम करीत असताना त्यांचे सहकारी त्याना देवदूत मानत असे. कारण एक अधिकारी म्हणून त्यांनी त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱयावर कधीच रुबाब गाजविला नाही किंवा त्यांचे मनबोल खच्ची केले नाही. त्याचप्रमाणे ज्याप्रकारे वाल्याचा वाल्मिकी झाला, त्याप्रमाणे त्यांनी अनेक गुन्हेगारांना सुधारायची संधी दिली. यामुळे अनेक गुन्हेगार गुन्हेगारी विश्वातून बाहेर येत सामान्य जीवन जगत आहेत. या गुन्हेगारांसाठी दिनकर मोहीते हे पोलीस अधिकारी नसून, एक देवमाणूस आहे. आजही त्यांच्या देव्हाऱयात दिनकर मोहीते या देवाची पूजा केली जाते. कोणीही गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही, तो या मार्गाकडे वळण्यास परिस्थिती देखील कारणीभूत नसते तर अनेक बाबी या कारणीभूत असतात, ज्याची कारणमीमांसा योग्यवेळी होत नसल्याने माणूस सोपी वाट दिसेल तिकडे धावत सुटतो. अशावेळी सोपी वाट म्हणजेच गुन्हेगारी जगताकडे जाणारी असल्याची पुष्टी दिनकर मोहीते यांनी अनेक गुन्हेगारांचे ब्रेन वॉश करताना केली आहे.
ज्याप्रकारे अनेक गुन्हेगारांचे आयुष्य त्यांनी बदलविले, अगदी त्याप्रकारे अनेक सराईत गुन्हेगारांना देखील त्यांनी शिक्षेपर्यंत पोहचविले आहे. यामध्ये हायप्रोफाईल असा तेलगी स्टॅम्प घोटाळा आहे. 2002 साली संपूर्ण जगाचे लक्ष या गुह्याच्या तपासावर लागले होते. या गुह्यात तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनादेखील गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर अनेक पोलीस अधिकाऱयांना तेलगीला मदत केल्याप्रकरणी अटक झाली होती. यावेळी तेलगी प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली होती. या पथकात दिनकर मोहीते यांची वर्णी लावण्यात आली होती. हा तपास करीत असताना रात्रं-दिवस एक करीत अनेक व्हाईट कॉलर गुन्हेगारांना मोहीते यांनी अटक केली. यामध्ये पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकारीदेखील होते. मात्र कायद्यासमोर सर्व सारखे याप्रमाणे त्यांनी कोणाचीदेखील हयगय केली नाही. मुंबईत ज्याप्रकारे त्यांनी कामाचा धडाका लावला होता, अगदी त्याचप्रकारे त्यांनी पोलीस निरीक्षक असताना कोल्हापूर हादरुन सोडले होते. कोल्हापूरमध्ये त्यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर कोल्हापूरातील अनेक गुंडांना सळो की पळो करुन सोडले होते. कित्येक गुंड त्यांच्या नावाने थरथर कापत होते. अशातच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे नेते डॉ. गोविंद पानसरे यांची 20 फेब्रुवारी 2015 साली अज्ञात मारेकऱयांनी गोळ्या घालून हत्या केल्याने, संपूर्ण देश हादरला. राज्य सरकार तसेच पोलीस दलावर या प्रकरणाच्या तपासासाठी मोठा दबाव येण्यास सुरुवात झाली. तर कोल्हापूरमध्ये दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली. यावेळी दिनकर मोहीते यांनी रात्रंदिवस एक करीत, समीर गायकवाड आणि त्याची पत्नी उमा यांना अटक केली. यामुळे कोल्हापूरमधील परिस्थिती निवळण्यास मदत झाली. तर दुसरीकडे राज्य सरकारने तत्काळ या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली. गुन्हेगारी जगतात दबदबा निर्माण करणाऱया पोलीस दलातील या तळपत्या सूर्याने अनेक अनाथालये, वृद्धाश्रम यांना दानधर्म केला. मात्र याची वाच्यता त्यांनी कधीच केली नाही. अशावेळी त्यांनी अनेकदा आपल्या स्वतःच्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष केले, पण इतरांची कुंटुंबे सुरक्षित केली. पोलीस दलातील 30 वर्षाहून अधिकच्या सेवेत अनेक चढ-उतार आले, मात्र पोलीस दलातील हा सूर्य (दिनकर) अधिक उत्साहाने तळपत राहिला. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱयाला मानाचा मुजरा !
– अमोल राऊत