कुंकळय़े येथील कलाकाराचा संसार उघडय़ावर
वार्ताहर /म्हार्दोळ
डोक्यावरील छत्र हरवलेले व उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेली काजू बागायतीही आगीच्या वणव्यात खाक झाल्याने आमशेवाडा कुंकळय़े येथील बाबनी जनू गावडे या 65 वर्षीय कलाकाराचा संसार उघडय़ावर आला आहे. सरकारकडे घर दुरुस्तीसाठी पंतप्रधान आवास योजनेसाठी केलेला अर्ज काही महिने पडून आहे. तसेच जळालेल्या काजू बागायतीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी केलेल्या तक्रार अर्जाचीही अद्याप सरकार दरबारी दखल न घेतल्याने या कलाकाराचे जगणे कठिण बनले आहे.
बाबनी हे गायक कलाकार असून सरकारकडून मिळणाऱया आर्थिक मदतीवर त्यांची कशीबशी गुजारणा सुरु आहे. आमशेवाडा कुंकळय़े, म्हार्दोळ येथे असलेल्या वडिलोपार्जित जुन्या घराची पडझड झाल्याने घराच्या बाजूला छोटीशी झोपडी उभारुन तेथे त्यांनी आपला संसार थाटला आहे. वडिलोपार्जीत काजू बागायती हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते. गेल्या 30 मार्च रोजी अज्ञातानी या बागायतीला आग लावल्याने फळाला आलेली 60 ते 70 काजूची झाडे जळून खाक झाली आहेत. या बागायतीमधून त्यांना एका हंगामात साधारण 40 ते 50 किलो काजूचे उत्पन्न मिळायचे. ही मिळकत बुडाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. जळालेल्या काजू बागायतीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी वनखात्यासह ग्रामपंचायत, मामलेदार व मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी लेखी निवेदन सादर केले आहे. या गोष्टीला दोन महिने उलटले तरी, अद्याप त्यांना कुणाकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही.
बाबनी गावडे यांच्या पत्नीचे निधन झाले असून त्यांच्या सोबत राहणारा एक भाऊही वारल्याने सध्या आपल्या जुन्या घरात तो एकटाच राहत आहे. या घराची पडझड झाल्याने त्यात राहणे धोक्याचे बनल्याने घराच्या बाजूलाच त्याने प्लास्टिकचे आवरण टाकून छोटीशी झोपडी उभारली आहे. सध्या या झोपडीत कसेबसे दिवस काढता येतील. मात्र पावसाळय़ात तेथे राहणे अवघड बनणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आपल्याला घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी मागील काही महिन्यापासून त्याचा पाठपुरावा सुरु आहे. मात्र अद्याप या अर्जाला उत्तर आलेले नाही. त्यामुळे यंदाचा पावसाळा कसा काढायचा हीच मोठी चिंता त्यांना लागून राहिली आहे. बाबनी गावडे हे गायक कलाकार असून त्यांनी पणजी येथील कला अकादमीमध्ये पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या मार्गदर्शनाखाली काहीकाळ गायनाचे धडे गिरवले आहेत. गावातच काही वर्षांपूर्वी ते गायनाचे वर्गही घ्यायचे. तेही बंद झाले आहेत. त्यामुळे सध्या कलाकार म्हणून सरकारकडून मिळणाऱया आर्थिक मदतीवर त्यांना कशीबशी गुजारणा करावी लागत आहे. सरकारने मोडकळीस आलेले घर उभारण्यासाठी आधार द्यावा व जळालेल्या काजू बागायतीची नुकसान भरपाई मिळावी अशी याचना त्यांनी केली आहे.