राष्ट्रपतींचे गौरवोद्गार ः प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून भाषण ः देशवासियांना शुभेच्छा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील अर्थव्यवस्था सध्या जगातील पहिल्या पाच देशांमध्ये विराजमान झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांचे कौतुक केले. भारत आज जागतिक स्तरावर एका गरीब आणि अशिक्षित राष्ट्रातून आत्मविश्वासपूर्ण आणि कणखर देश बनला आहे. राज्यघटनेच्या रचनाकारांच्या सामूहिक बुद्धीच्या मार्गदर्शनाशिवाय ही प्रगती शक्मयच नव्हती असे सांगतानाच सद्यस्थितीतील ‘आत्मनिर्भर’ योजनेचेही त्यांनी समर्थन केले.
74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी सायंकाळी देशवासियांना संबोधित केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला झालेले हे त्यांचे पहिलेच भाषण होते. गेल्यावर्षी जुलैमध्ये राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशवासियांना पहिला संदेश जारी केला होता. आता प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मी देशात आणि परदेशात राहणाऱया सर्व भारतीय जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन करते. आपण एक राष्ट्र म्हणून एकत्रितपणे केलेल्या कामगिरीचा उत्सव आनंदाने साजरा करुया, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारतीय अर्थव्यवस्थेने कठीण काळात जागतिक पातळीवर आपली चमक दाखवलेली आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या जागतिक पार्श्वभूमीवर पाचव्या स्थानापर्यंत घेतलेली झेप निश्चितच कौतुकास पात्र आहे. सक्षम नेतृत्व आणि प्रभावी संघर्षाच्या बळावर आम्ही मंदीतून बाहेर पडत देशविकासाचा प्रवास सुरू ठेवला आहे. सरकारच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे हे शक्मय झाले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यातूनच ही प्रगती होत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. तसेच आपण सर्व भारतीय एक आहोत. विविध पंथांनी आणि भाषांनी आपल्याला विभागले असूनही आपण एकत्र नांदत आहोत. प्रभावी लोकशाहीमुळेच हे शक्य असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.
जी-20 चे अध्यक्षपद
यावषी भारत जी-20 देशांच्या गटाचे अध्यक्षपद भूषवत आहे. आपल्या वैश्विक बंधुत्वाच्या आदर्शाच्या अनुषंगाने, आम्ही सर्वांसाठी शांतता आणि समृद्धीसाठी उभे आहोत. जी-20 चे अध्यक्षपद भारताला एक चांगले जग निर्माण करण्यात योगदान देण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका देईल, असा आशावादही राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
ग्लोबल वॉर्मिंग मोठे आव्हान
ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल या जागतिक आव्हानांची झळ भारतालाही बसत आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी भारत वेगवेगळय़ा उपाययोजना करत आहे. जागतिक तापमान वाढत असतानाच हवामान बदलाचे टोकाचे प्रकार दिसून येत आहेत. विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्राचीन परंपरांकडे नव्या दृष्टीकोनातून पाहावे लागेल. आपल्या मूलभूत प्राधान्यांचाही आपल्याला पुनर्विचार करावा लागेल. पारंपारिक जीवनमूल्यांचे वैज्ञानिक परिमाण समजून घेतले पाहिजेत. आपल्या मुलांनी या पृथ्वीवर सुखी जीवन जगावे असे वाटत असेल तर आपली जीवनशैली बदलण्याची गरज आहे, असेही राष्ट्रपतींनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे कौतुक
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 21 व्या शतकातील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना तयार करते आणि आपल्या सभ्यतेवर आधारित ज्ञान समकालीन जीवनाशी संबंधित बनवते. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध संस्थांच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत हा काही आघाडीच्या देशांपैकी एक आहे, असे गौरवोद्गारही राष्ट्रपतींनी काढले. तसेच महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानता या आता केवळ घोषणा नसल्याचे भारताने दाखवून दिले आहे. आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले प्राविण्य सिद्ध केले आहे. तसेच भविष्यातही भारताला आकार देण्यासाठी स्त्रियाच जास्तीत जास्त योगदान देतील. सक्षमीकरणाची ही दृष्टी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसह दुर्बल घटकांसाठी सरकारच्या कार्याला दिशा देईल, असे त्यांनी पुढे सांगितले.